माले, ता. १९ : मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे धरणाच्या कडेला हॉटेल व रिसॉर्टमधील कचऱ्याची अवैध विल्हेवाट लावली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, जल आणि वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
मुळशी- ताम्हिणी मार्गावरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटन केंद्रांमधील ओला व सुका कचरा मुळशी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर टाकला जात आहे. हा कचरा जाळल्यामुळे धुराचे लोट पसरत असून, सडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात हा कचरा धरणाच्या पाण्यात मिसळून जलप्रदूषण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मोठ्या वाहनांतून हा कचरा आणून येथे टाकला जातो. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, काही ठिकाणी कचरा गाडला जातो तर काही ठिकाणी जाळला जातो. संबंधित आलिशान हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःच्या जागेत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावा आणि प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत काजल मोरे यांनी सांगितले की, ‘‘मुळशी खुर्द येथील टाटा कंपनीच्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान प्लॅस्टिक, अन्नाचा कचरा, वापरून फेकायच्या वस्तूंचे ढीग आढळले. यामुळे वायू व जलप्रदूषण होत असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. जबाबदारांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.’’
याबाबत टाटा पॉवर कंपनीचे मुळशी धरण प्रभारी सुरेश कोंडूभैरी यांच्या संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
कचरा प्रकरणात दुर्लक्ष?
टाटा कंपनीच्या जागेत राहणाऱ्या धरणग्रस्तांनी घर दुरुस्ती किंवा विस्तार सुरू केल्यास तत्काळ कारवाई केली जाते. मात्र, अनेक
वर्षांपासून सुरू असलेल्या या कचरा प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले जाते? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
या कचरा प्रकल्पाशी ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नाही. पूर्वी स्थानिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात होती. मात्र, काही वर्षांपासून बाहेरील हॉटेल्सचा कचरा येथे आणला जाऊ लागल्याने प्रदूषण वाढले आहे. कचरा जाळताना ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपणालाही नुकसान झाले आहे. याविरोधात पत्रव्यवहार केला आहे.
- सुनील पासलकर, सरपंच, मुळशी खुर्द
प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी हा प्रकल्प चालवण्यात येत होता. स्थानिक नागरिकांचा कचरा मोफत उचलण्यात येत होता. पूर्वी हॉटेल व्यावसायिक रस्ता, नाल्यात कचरा टाकल्याने धरणात प्रदूषण होत होते. ते टाळण्यासाठी कचरा एका ठिकाणी एकत्र करून विल्हेवाट लावण्यात येत होती. व्यावसायिकांकडून प्रमाणानुसार शुल्क आकारण्यात येत होते. मिळालेल्या उत्पन्नातून प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी तीन स्कूल बस, गरजूंसाठी मोफत रुग्णवाहिका चालवण्यात येते. माले आरोग्य केंद्र, पोलिस यांना वेळोवेळी प्रतिष्ठान सहकार्य करते. विरोधाला स्थानिक राजकारणाची झालर असून, आठ वर्षांनंतरचा विरोध त्यांचा हेतू स्पष्ट करतो. त्यामुळे हा प्रकल्प बंद केला आहे.
- प्रज्वल कानगुडे, संस्थापक अध्यक्ष, मावळा प्रतिष्ठान
मुळशी खुर्द (ता. मुळशी) ः धरणाच्या कडेला टाकण्यात आलेल्या कचऱ्याचे ढीग.
01345, 01346
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.