उरुळी कांचन, ता. २७ : नायगाव (ता. हवेली) गोळीबार प्रकरणात फरार आरोपींना जेरबंद करण्यात उरुळी कांचन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. तपासाची सूत्रे जुन्या शेतीच्या वादाभोवती फिरू लागली आहेत.
नायगाव येथील कबीर चायनीज हॉटेलमध्ये गावठी पिस्तुलाने गोळीबार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन प्रमुख फरार आरोपींना उरुळी कांचन पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केले. सिद्धार्थ गोविंद कांबळे (वय २८, रा. कोरेगाव मूळ) आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे (वय २० रा.उरुळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, ४ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास नायगाव येथील कबीर चायनीज हॉटेलमध्ये, फिर्यादी मिलिंद बापू शेलार (वय ३८) असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी हल्ला केला, त्यातील एकाने पाण्याची बाटली मागण्याचा बहाणा करून शेलार यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले होते. याप्रकरणी १२ फेब्रुवारीला उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी नवनाथ आनंदा घुले (वय २८ रा.दहिटणे) याला व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार सिद्धार्थ गोविंद कांबळे आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे हे नाशिक परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही अटक केली. चौकशीत फिर्यादी आणि सिद्धार्थ कांबळे यांच्यात जुना जमिनीचा वाद असल्याचे समोर आले असून याच वादातून सिद्धार्थने इतर साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे.