उत्रौली, ता. १७ : कापूरव्होळ- मांढरदेवी- वाई मार्गावरील वनविभागाच्या हरकतीमुळे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. नवी मुंबईचे नगरसेवक शिवाजी खोपडे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर ही कार्यवाही करण्यात आली. भोर- मांढरदेवी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना निळकंठ, गोकवडी आणि आंबाडे हद्दीतील सुमारे सव्वादोन किलोमीटरचे काम वनविभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे बंद होते. यामुळे भाविक आणि प्रवाशांना मोठ्या दुरवस्थेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजी खोपडे यांनी वनमंत्र्यांची भेट घेऊन रखडलेल्या कामाला परवानगी देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक परवानग्या देऊन काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.