VRG26B06220, VRG26B06221
वैराग नगरपंचायत दर्जामुळे शेतकरी योजनांपासून वंचित
ग्रामीण अनुदान बंद; विहिरीसारख्या योजनांचे निम्मेच अनुदान
वैराग, ता. २६ : वैराग ग्रामपंचायतीचे २०२२ मध्ये नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ग्रामीण भागासाठी लागू असलेल्या विविध शेतकरी व पशुसंवर्धन योजनांवर परिणाम झाला आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना नव्या प्रशासकीय बदलामुळे योजनांसाठी अपात्र ठरवले जात असल्याने अनेक तक्रारी वाढत असून नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत अस्तित्वात असताना शेतकऱ्यांना गाय-गुरांच्या गोठ्याच्या बांधकामासाठी अनुदान, शेळी-बकरी पालन योजना, कोंबडी पालन (पोल्ट्री) अनुदान तसेच दुग्धव्यवसायासाठी गाई खरेदी अनुदान, नवीन विहिरी व जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अनुदान अशा अनेक योजनांचा लाभ मिळत होता. मात्र वैराग शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर या योजना बंद झाल्या आहेत. ‘ग्रामीण क्षेत्रापुरत्या मर्यादित’ असल्याचे कारण देत अर्ज व चालू कामे प्रलंबित ठेवण्यात आल्याने शेतीपूरक व्यवसाय उभारण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे.
वैराग शहरातील बहुतांश कुटुंबांची उपजीविका शेतीवरच आधारित आहे. वैराग नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट झाल्याने काही कर व शुल्कांमध्ये वाढ झाली आहे; मात्र त्यामुळे व्यवसाय व नवीन उद्योगधंदे निर्माण झालेले नाहीत. उत्पन्नाचे प्रमुख साधन शेतीच असल्याने संक्रमण काळात प्रशासनाने विशेष तरतूद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शासनाने नगरपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून पूर्वीप्रमाणे अनुदान योजना सुरू ठेवाव्यात; अन्यथा विकासाच्या नावाखाली शेतकरी अडचणीत येतील, अशी भावना नगरपंचायतीचे दिवाबत्ती व स्वच्छता सभापती नागनाथ वाघ यांनी व्यक्त केली.
--
निम्मेच अनुदान मिळाले
आमच्यासह कित्येकांचे उत्पन्न शेतीवरच अवलंबून आहे. मात्र गावाचा दर्जा बदलल्याने आम्हाला योजनांपासून वंचित ठेवले. यामुळे शेतीच्या उत्पन्नात कसलीही वाढ झाली नाही. उलट अनुदान योजना बंद पडल्या. असे शेतकरी राजेंद्र घोडके यांनी म्हटले तर महेंद्र निंबाळकर यांनी ग्रामपंचायत असताना निम्मी विहिर झाली ठराविक अनुदानही मिळाले दरम्यान नगरपंचायत झाली आणी पुढील अनुदान स्थगित केले. परिणामी आजही माझी विहीर अर्धवट अवस्थेत असल्याचे या दोन्ही शेतकऱ्यांनी सांगितले.
कोट
- गाय-गुरे गोठा, शेळी-बकरी व कोंबडी पालन यासारख्या ठराविक योजना ग्रामीण निकषांवर आधारित आहेत. नगरपंचायत दर्जा असल्याने त्या येथील बंद झाल्या असून, नगरपंचायत क्षेत्राबाबत शासनाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा आहे
- सतीश नागरगोजे, पशुसंवर्धन अधिकारी
कोट
शेतीविषयक सर्वच योजना बंद झाल्या नसून काही ठराविक योजना ज्या ग्रामीण भागाचा निकष असलेल्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. बाकी ज्या योजना सुरू आहेत. त्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
- अण्णासाहेब नलावडे, कृषी सहायक
कोट
वैराग शहराचा विकास हाच उद्देश ठेवुन नगरपंचायतची मागणी करून ती सर्वांनी पुर्णत्वास नेली असली तरी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. संबंधित विभागाशी चर्चा करून शासनाकडे विशेष सवलतीसाठी पाठपुरावा करू.
निरंजन भुमकर, उपनगराध्यक्ष
कोट
- माजी आमदार राजेंद्र राऊत, व पंचायत समिती सदस्य संतोष नंबाळकर यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा करू म्हटले.
शाहुराजे निंबाळकर, विरोधी पक्षनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.