Grain Distribution village
Grain Distribution village Sakal
सातारा

घरकोंडीपूर्वीच ६१ गावांत धान्‍य पोच

सकाळ वृत्तसेवा

सातारा - संततधार पावसाळ्यात महाबळेश्‍‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील गावांचा तीन महिन्‍यांहून अधिक काळ संपर्क तुटतो. संततधार पाऊस, धुके, सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे या गावांतील ग्रामस्‍थ पावसाळ्याच्‍या काळात घरांना झड्या लावून स्‍वत : घरकोंडी करून घेतात. घरकोंडीच्‍या काळात दुर्गम ६१ गावांतील ग्रामस्‍थांची अन्नधान्‍यासाठी ओढाताण होऊ नये, यासाठी आवश्‍‍यक असणारे तीन महिन्‍यांचे सुमारे ४० टन धान्‍य पुरवठा विभागाने नुकतेच वितरित केले आहे.

महाबळेश्‍‍वर, जावळी तसेच कोयना खोऱ्यातील वनक्षेत्रात अनेक दुर्गम गावे असून त्‍याठिकाणचे अर्थकारण पावसाच्‍या भरवशावरील शेती आणि मुंबईत राबणाऱ्या हातांवर अवलंबून असते. पावसाळा हा दुर्गम भागातील गावांत राहणाऱ्या ग्रामस्‍थांसाठी सर्वांत कठीण काळ ठरतो. संततधार पाऊस, सोसाट्याचा गार वारा, दाट धुक्‍यामुळे या गावांचा पावसाळ्यातील सुमारे अडीच ते तीन महिने इतर भागाशी संपर्क तुटतो. पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी अशा दुर्गम गावांत राहणाऱ्यांच्‍या घरातील कणग्‍यांनी तळ गाठलेला असतो.

पेरणी, कापणी, मळणी होऊन नवीन धान्‍यासाठीचा कालावधी लक्षात घेत पावसाळ्यापूर्वीच या गावांतील नागरिक अतिवृष्‍टीच्‍या काळासाठीच्‍या धान्‍यसाठ्यावर भर देतात. रानमेव्‍याच्‍या विक्रीतून तसेच मुंबईकरांच्‍या पैशातून त्‍यांची पावसाळ्यासाठीची बेगमी सुरू असते. पडत्‍या पावसांत राने तुडवून पेरणी झाल्‍यानंतर येथील प्रत्‍येक ग्रामस्‍थ अतिवृष्‍टीत स्‍वत:ला घरात कोंडून घेतो. या काळात उपलब्‍ध धान्‍यावरच त्‍यांची गुजराण सुरू असते. यामुळे या भागांना पावसाळ्यापूर्वी प्राधान्‍याने शासनाच्‍या वतीने सर्वच योजनांतील धान्‍य पुरविण्‍यात येते.

यंदाही अशाच प्रकारे जिल्‍हा पुरवठा विभागाने महाबळेश्‍‍वरातील ६१ गावांतील सुमारे १३ हजार जणांना जून, जुलै आणि ऑगस्‍ट महिन्‍ंयाचे असे परिमाण लक्षात घेत १२ टन तांदूळ आणि २६ टन गव्‍हाचे वितरण आगाऊ स्‍वरूपात केल्‍याची माहिती जिल्‍हा पुरवठा अधिकारी स्‍नेहा देवकाते-किसवे यांनी दिली. जावळी तालुक्‍यातील दुर्गम गावांना जोडणारे हमखास रस्‍ते उपलब्‍ध झाल्‍याने त्‍याठिकाणी यंदा असा धान्‍यसाठा पुरविण्‍यात आला नाही.

आगोटीच्‍या बाजारावर भर

संततधार पाऊस सुरू झाल्‍यानंतर महाबळेश्‍‍वरसह कास, तापोळा, बामणोलीच्‍या कड्याकपारीतील अनेक गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. या काळात कोणत्‍याही वस्‍तूंची कमतरता भासू नये, यासाठी पाऊस काळात आवश्‍‍यक असणारे तेल, मीठ, तिखट तसेच इतर जीवनाश्‍‍यक ‍वस्‍तूंचा साठा करण्‍यावर या गावांतील स्‍थानिकांचा भर असतो. यासाठी अनेकजण रानमेवा घेऊन उन्‍हाळ्याच्‍या शेवटच्‍या काळात जवळच्‍या बाजारपेठेत दाखल होतात. रानमेव्‍याच्‍या विक्रीतून येणाऱ्या पैशातून दररोज थोड्याथोड्या जीवनाश्‍‍यक वस्‍तूंची खरेदी त्‍या ग्रामस्‍थांकडून करण्‍यात येते. या खरेदीला काही भागात आगोटीचा बाजार म्‍हणून त्‍या त्‍या भागात ओळखले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT