सातारा

सातारा : शासकीय कर्मचाऱ्यांना लाचखोरीचा मोह

- प्रवीण जाधव

सातारा : कोरोना संसर्गाच्या(corona) मुकाबल्यासाठी सर्वजण झगडत असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांना(government employees) लाचखोरीचा मोह आवरलेला नाही. वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department)१९ जणांवर केलेल्या कारवाईतून हेच स्पष्ट होत आहे. कोरोना काळातही सहा जणांवर कारवाई झाल्याने महसूल विभागाने(Revenue department) लाचखोरीत आघाडी राखली आहे.

राजकीय नेत्यांनी कितीही घोषणा केल्या तरी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवास्वप्न ठरत आहे. आपले काम वेळेत व्हावे, यासाठी कोणतीही कुरबूर न करता, न मागताही पैसे हातावर टेकवायची नागरिकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे न्याय कामही वेळेत व्हावे, यासाठी माया द्यावी लागत आहे. लाचखोरीवर आळा बसविण्यासाठी लाचलुचपत विभागाची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. पूर्णत: गोपनीय कामकाज असलेला हा विभाग कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध सापळा लावण्यास कचरत नाही. तक्रारदार आल्यापासून ते कारवाई पार पाडण्यापर्यंत सर्व कामे गोपनीयपणे केली जातात.

लाचखोरास अटक करेपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांना कोणाला पकडायचे आहे, याची कल्पनाही दिली जात नाही. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा मोठ्या दर्जाचा दुसऱ्या खात्यातील शासकीय अधिकाऱ्याचा कारवाईत पंच म्हणून सहभाग केलेला असतो. तक्रार चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास किंवा काही गडबड केल्यास या विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे, तसेच ज्या कामासाठी लाच मागितली आहे, ते योग्य कामही लवकरात लवकर करून देण्याची जबाबदारी लाचलुचपत विभाग पार पाडते. त्याचबरोबर आता तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे तक्रार दिल्यामुळे काम रखडेल, पुन्हा कर्मचाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळणार नाही, अशी भीती बाळगण्याचेही तक्रारदाराला कारण नसते.

गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात कोरोना संसर्गाशी लढा चालू आहे. त्यामध्ये माणुसकीची भावना सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यातही दिसून आली. परंतु, अशा महामारीच्या काळातही लाचेचा लोभ असलेले प्रशासनातील महाभागही आहेत. कोरोनाच्या या काळात वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ जणांवर कारवाई केली. त्यामध्ये महसूल, पोलिस, वीज वितरण, वन विभाग, कामगार, ग्रामविकास विभागाबरोबर परवानाधारक प्लंबरवरही कारवाई करण्यात आली.

त्यातही सर्व विभागातील कारवायांमध्ये वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक १३ एवढी आहे. बहुतांश वर्षाप्रमाणे याही वेळी महसूल विभागाने लाचखोरीत अव्वल असल्याचे दाखवून दिले. महसूल विभागातील विविध पदांवरील सहा व्यक्तींवर वर्षभरात कारवाई झाली. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी मध्यस्थांवरही ‘लाचलुचपत’ने टाच आणली आहे. एकूण चार मध्यस्थांवर वर्षभरात कारवाई झाली आहे.

तक्रारीसाठी पुढे या : अशोक शिर्के

लाचखोरीच्या समूळ उच्चाटनासाठी गरज आहे, ती नागरिकांच्या पुढाकाराची, भ्रष्टाचारविरुद्धची चीड तक्रार देऊन व्यक्त करण्याची. प्रत्येक नागरिकाने लाच देणार नाही, असा ठाम निश्‍चय केला तरच भ्रष्टाचार रोखला जाऊ शकतो. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.

वर्षभरात विभागनिहाय कारवाया

महसूल- ६

पोलिस-३

वन-२

कामगार-१

वीज वितरण-२

ग्रामविकास-२

तलाठी मदतनीस-१

परवानाधारक प्लंबर-१

वित्त-१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT