Dhule Monsoon News : शाश्वत आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून मका अन् काही झाले तरी हक्काचे दोन रुपये देणारे पीक म्हणून कांद्याकडे हमखास शेतकऱ्यांचा कल असतोच. यंदा साक्री तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके ‘बळीराजा’ने सोसले आहेत. विहिरींना पाणीच नसल्याने जी लागवड, पेरणी होईल ती पावसाच्या पाण्यावरच. (Rainfall at most places in Sakri Taluka )
पावसाने सातत्य ठेवले, जोरदार पाऊस झाला तर पुन्हा विहिरी भरतील, या भाबड्या अपेक्षेने खास ‘कांदा’ पिकासाठी थोडेसे का होईना रिक्त क्षेत्र ठेवत खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू असून, आंतरमशागतीला वेग आला आहे. अत्यल्प पावसामुळे विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने पांढरे सोने अर्थात, बागायती कपाशीचे क्षेत्र घटणार आहे. दुसरीकडे पाऊस झाल्याने उशिरा का होईना पावसाळी कापूस लागवड केली जात आहे.
राज्यातील ९४ दुष्काळी तालुक्याच्या यादीत साक्री तालुक्याचे नाव अग्रभागी असते. गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या आठवणी मात्र कायम राहणार आहेत. एरवी कमी-अधिक प्रमाणात बागायती शेतीसह शेतीला जोडधंदा करणारे पशु-पालक, दुग्ध व्यावसायिकांना दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा जोरदार आणि चांगल्या पावसाचे भविष्य वर्तविले असून, ७ जूनपासून तालुक्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. (latest marathi news)
काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वेगवान वादळाने नुकसानीचा डोंगर उभा केला आहे. अशा परिस्थिती ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या ओळींनुसार कोणीही दिलासा दिला नसला स्वतःच्या संसारासाठी, मुलांसाठी व जीवापाड जपलेल्या पशुधनासाठी खोळ खोचून काळ्या मातीत नवीन स्वप्न पाहत बळीराजा सज्ज झाला आहे.
कांद्यानंतर मका पिकाकडे लक्ष
दरवर्षी पावसाळी, उन्हाळी कांदा अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत आणत असल्याचे वास्तव आहे. अलिकडे कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने केलेला खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड असते.
शासनाने उत्पादन खर्चावर आधारित तरी भाव दिला जावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांची असते. खरिप हंगामावर पुढील समीकरणे अवलंबून असल्याने पावसाने हजेरी लावताच पेरणीची लगबग सुरू झाली आहे. साक्री तालुक्यात मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, चवळी, कापूस, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची खरिप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे.
कांदा बियाणे, रोपे महागणार
गेल्यावर्षीच्या तीव्र दुष्काळामुळे विहिरींना पाणी नसल्याने कांदा रोपे मिळणे दुरापास्त होणार आहे. बदलत्या वातावरणामुळे यंदा रोपासाठी लावलेली बियाण्याची उगवण क्षमता बिघडली आहे. शेतकरी शक्यतो शेतात डोंगळे (ढोले) लावून कांद्याचे बियाणे तयार करतात. यावर्षी शेतकऱ्यांकडे बियाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर बाजारातील कंपन्यांच्या कांदा बियाण्यातही यंदा मोठी वाढ झाली आहे. प्रतिकिलो हजार ते पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी घरचे बियाणे (उळे) तयार करून घेतले आहे.
मका, बाजरीला प्राधान्य
साक्री तालुक्यात निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्यातील बाजरी, मका, ज्वारी, नाचनी, कडधान्यातील मुग, उडीद, चवळी, मठ, सोयाबीन आदींची पिकांची पेरणी केली जाते. अलिकडे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचा अडिच ते तीन महिन्याचा कालावधी असल्याने लवकर हंगाम घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.