नाशिक : स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करुन देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक उपक्रम साजरे केले जातात. यंदा स्त्री शिक्षणाचा गौरव करण्यासाठी ग्रामीण भागात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर शनिवारी भरण्यात येणाऱ्या दप्तरमुक्त शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपूर्वी ( ३ जानेवारी ) याबाबत नियोजन करावे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या निर्णयाचे ग्रामीण भागातील पालकांनी स्वागत केले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक घराच्या दारांवर मुलीच्या नावाची पाटी
महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, स्त्री हक्क किंवा एकंदरीतच स्त्रियांच्या हक्कांसदर्भात अनेकजण बोलत असतात. मात्र तरीही समाजात स्त्रीयांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त होते. त्यामुळे विद्यार्थीदशेपासून स्त्रीसन्मानाचा वारसा जोपासण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घराच्या दारांवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी ग्रामसेवक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, माता पालक संघाच्या सदस्या यांचे सहकार्य घ्यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
घरावर माझ्या नावाची पाटी का नाही?
यापूर्वी येवला तालुक्यात काही शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता. एका शिक्षकाच्या मुलीने घरावर माझ्या नावाची पाटी का नाही, असा प्रश्न विचारला आणि त्यांनी मुलीच्या आनंदासाठी त्यांनी घराच्या दरवाजावर लावली. जिल्हा परिषदेत सध्या महिलाराज असल्याने जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावण्याचा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दप्तरमुक्त शाळादिनी गावांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी काढून, गृहभेट, पालक भेट घेऊन मुलींच्या नावांच्या पाटीचा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
मुलगी सुद्धा वंशाचा दिवा
प्रत्येक कुटूंबाला मुलीचं महत्त्व पटवून दिले आणि त्या घरावर त्या मुलीच्या नावाची पाटी लावल्याने मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी होईल. या अभिनव उपक्रमाद्वारे गावांमध्ये प्रत्येक घरांवर 'लेक वाचवा, लेक शिकवा' असा संदेश दिला जाईल. मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे, ही संकल्पना दृढ होईल.
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टाहास का ?
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारं खुली करुन दिल्याने आज अनेक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. मात्र आज ही स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी सारखे प्रकार घडत आहेत. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टाहास केला जातो आणि मुलीवर अन्याय होतो. ग्रामीण भागातील हे चित्र बदलावे आणि मुलींना त्यांचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने अनोखे अभियान सुरु करण्यात आले आहे.
या अभियानास चांगला प्रतिसाद मिळेल..अशी अपेक्षा..
मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांचा सन्मान ही एक चळवळ बनायला हवी. ग्रामीण भागात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. स्त्री सन्मानाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्या गावातील प्रत्येक घरांवर मुलींच्या नावाची पाटी दिसावी. शिक्षकांनी प्रभावीपणे उपक्रम राबवावा. - एस भुवनेश्वरी, मुख्य कार्यकारी अधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.