अकोला : भारतातून आखाती देशांना प्रामुख्याने सागरी मार्गाने अन्नधान्य व वस्तूंची निर्यात होते. भारत संयुक्त अरब अमिरातीला मोठी निर्यात करतो. त्यासाठी लागणारे कंटेनर्स गेली दोन वर्षे कमी संख्येने उपलब्ध होते. आता कंटेनर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २० फुटी कंटनर्ससाठी पूर्वी एक हजार १०० डॉलर्स एवढे वाहतूक शुल्क लागत होते.
आता हे वाहतूक शुल्क तिपटीने कमी झाले आहे. सध्या कंटनर्सचे वाहतूक शुल्क ३७५ डॉलर्स झाले असून, या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्र्वभूमिवर भारतातील निर्यातदार व्यापाऱ्यांनी आखाती देशांमध्ये निर्यात वाढविल्यास भारतीय उद्योगांना व देशाला चांगला फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन दुबई स्थित अलअदिल उद्योग समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.
भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील निर्यातदार व्यापाऱ्यांना उद्देशून काढलेल्या या संदर्भातील प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मसालाकिंग धनंजय दातार यांनी म्हटले आहे की, ‘संयुक्त अरब अमिरातीचे चलन दिनहम सुद्धा भारत, पाकिस्तान, युके व युरोपीय देशांच्या चलनाच्या तुलनेत वधारले आहे. त्याचा परिणाम दुबईतील आयात स्वस्त होण्यात होईल. भारत हा देश संयुक्त अरब अमिरातीच्या अन्नधान्य तथा खाद्य उत्पादने आयातीचे प्रमुख स्रोत आहे.
या प्रमुख पुरवठादारांकडून येणारे तांदूळ, मसाले, सुकामेवा, भाज्या व इतर खाद्य उत्पादने अमिरातीतील ग्राहकांत मोठ्या प्रमाणावर वापरतात. भारताला यंदा अनुकूल हवामानामुळे किराणा उत्पादनांच्या निर्यातीत आघाडी घेण्याची संधी आहे. या संधीचा भारतीय उद्योजक, व्यापारी यांनी फायदा घ्यायला हवा. युक्रेन व रशियातील युद्धस्थिती सध्या शांत असल्याने तेथून निर्यात सुरू झाली आहे. त्याचा फायदा विशेषतः खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्यात होईल, असे दातार यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.