नागपूर : मला विधापरिषदेची उमेदवारी देणार हे माध्यमातूनच कळले. मी कोणाकडेही उमेदवारी मागितली नव्हती. कदाचित मला वेगळी जबाबदरी पक्षाला द्यायची असेल... पक्षाने जेव्हा लढ म्हटलं तेव्हा लढलो, थांबायला सांगितले तेव्हा थांबलो. पक्ष जो आदेश देईल ते करू असे सांगून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नारजीवर थेट भाष्य करण्यास टाळले.
बावनकुळे यांनी विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाने अन्याय केला असे वाटते का या प्रश्नावर त्यांनी, मला भाजपने 15 वर्षे आमदार व पाच वर्षे मंत्री केले. तसेच 33 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली होती.
सध्या कोरोना समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेत तरुणांना संधी देण्यात आली आहे. माझ्यावर कदाचित पक्षाला दुसरी जबाबदारी सोपवायची असेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच माझ्यावर अन्याय झाला असे सांगताना पाच वर्षे ऊर्जाखात्याचे काम सर्वोत्कृस्ट होते असेही म्हटले. ही आपल्या कामाची पावतीच असल्याचे बावनकुळे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कालच्या बोलण्यावरून पक्षाची भूमिका ठरलेली दिसत आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याची ही भूमिका आहे. 28 वर्षांपासून मी भारतीय जनता पक्षाचे काम करीत आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडणार आहे, असेही बावनमुळे म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्य नेतृत्वाने माझ्या नावाची शिफारस केली होती, हे मला प्रसारमाध्यमांतूनच कळले. मी स्वतः त्याबद्दल कुणाशीही बोललो नव्हतो. भारतीय जनता पक्षातील आणि इतरही पक्षांतील काही लोकांना वाटत असेल की माझ्यावर अन्याय झाला तर ही त्यांची भावना आहे. हे सांगताना "माझ्यावर अन्याय झाला', असे स्पष्ट विधान बावनकुळे यांनी आजही केलेले नाही. मंत्री असताना विधानसभेत लोकहिताचे विविध प्रस्ताव मी आणले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.