नागपूर : कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मृत्यूसंख्येतही वाढ होते आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या स्थितीत सोशल डिस्टंसिंग खूप गरजेचे आहे. मात्र आज जनता कर्फ्यू घोषित केला तर नागरिक उद्या काही मिळणारच नाही, अशा पद्धतीने गर्दी करतात. त्यामुळे जनता कर्फ्यू नाही, परंतु उद्या, शनिवार तसेच रविवार, हे दोन दिवस नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरामध्येच रहावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी आज केले. पुढील आठवड्यात मात्र जनता कर्फ्यूचा निश्चितच विचार करण्यात येईल, अशी पुस्ती त्यांनी ‘सकाळ'सोबत बोलताना जोडली.
जोशी यांनी आज एक व्हिडिओ प्रसारित करून नागपूरकरांना शासनाचे दिशानिर्देश पाळण्याचे आवाहन केले. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आयसीएमआर व इतर संस्थांनी सप्टेंबरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काल, ३ सप्टेंबरला सहा हजार नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या, यापैकी १७५० जण पॉझिटिव्ह आढळून आले. या गंभीर स्थितीतही अनेकजण फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली. अनेक लोकप्रतिनिधींनी जनता कर्फ्यूची मागणी केली. परंतु आज जनता कर्फ्यूची घोषणा केली तर लगेच नागरिक जणू काही मिळणारच नाही, अशा पद्धतीने दुकान, भाजी बाजारात गर्दी करतात. त्यामुळे उद्या शनिवार व रविवार जनता कर्फ्यू नाही.
आता पुरे! कडक दंडात्मक कारवाई
अनेकजण अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे आता अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही ही कारवाई सुरू होती, परंतु आता कठोर व्हावे लागणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला देण्यात आले आहे. त्यामुळे उद्या शनिवार, रविवारी नागरिकांनी कारवाईची वेळ येऊ देऊ नये, असेही महापौर जोशी म्हणाले.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.