नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महिनाभरात १३५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नव्वद टक्के संख्या लसीकरण पूर्ण न झालेल्यांची आहे. लस न घेणाऱ्या जिल्ह्यातील पाच लाख नागरिकांना धोका असल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली. आज झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. यावेळी पुढील धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्त्वाची बाब असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना दिली. तिसरी लाट अत्यंत सौम्य आहे, असा भ्रम अनेकांना आहे. मात्र, ही बाब खोटी असून केवळ लसीकरणाचा टक्का वाढल्याचे त्यावर नियंत्रण मिळविता येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली.
भविष्यात काळजी घेतली नाही तर कोरोनामुळे हृदय, किडनी, विचार करण्याची शक्ती यात अडचणी निर्माण होतील. आजवर लशीचा एकही डोस घेतला नसलेल्यांना सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ही गाव पातळीवरील यंत्रणा जागृत करीत आहे. नागरिकांना दूरध्वनी करून यंत्रणेमार्फत डोस घेण्याबाबत सातत्याने सांगितले जाते. मात्र अनेक ठिकाणी कोरोनाला फारसे गंभीर्याने घेतले जात नाही. ही बाब अतिशय धोकादायक आहे, असेही त्या म्हणाल्या.
..तरच निर्बंध शिथिल
नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत ९८.५८ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. ६८.३१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तर, शहरातील २ लाख आणि ग्रामीण भागातील ३ लाख आठ हजार नागरिकांनी आजही लसीचा दुसरा डोस घेतला नाही. ही पाच लाख लोकसंख्या कोरोनासाठी पूरक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी या सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. जोपर्यंत १०० टक्के लसीकरण होणार नाही, तोपर्यंत अनेक निर्बंध जिल्ह्यात कायम राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
लसवंत एक, नोंदणी दोन क्रमांकावरून
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोबाईल नंबरच्या मदतीने नागरिकांना नोंदणी करावी लागते. जिल्ह्यातील काही नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेताना एक क्रमांक आणि दुसरा डोस घेताना दुसऱ्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. यामुळे, माहिती अद्ययावत करताना प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहे. कोविन पोर्टलवर ही माहिती अद्ययावत करण्याची सोय असून अशा लसवंतांनी ही माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.