मी पुन्हा सांगेन...

प्रत्येक घराघरात म्युच्युअल फंडासारख्या चांगल्या पर्यायात गुंतवणूक व्हावी
mutual funds
mutual funds sakak

आतापर्यंत मी माझ्या लेखांतून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीविषयी बरीच माहिती तुमच्यापर्यंत पोचवली आहे. प्रत्येक घराघरात म्युच्युअल फंडासारख्या चांगल्या पर्यायात गुंतवणूक व्हावी, अशीच यामागची भावना असते. या भावनेबरोबर ती गुंतवणूक दीर्घकालीन असावी, अशीही अपेक्षा असते. कारण दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीतूनच फायदा होतो. बऱ्याच गुंतवणूकदारांचा आता या प्रकारच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. २०२० मध्ये डी-मॅट खात्यांची संख्या साधारण चार कोटी होती, ती आता १० कोटींच्या पुढे गेली आहे.

पण असे जाणवते, की ‘दीर्घकालीन गुंतवणूक’ ही संकल्पना अजून बऱ्याच जणांच्या डोक्यात रुजलेली नाही. असे म्हणण्यामागचे कारण असे, की गेले वर्षभर केलेल्या गुंतवणुकीवर फारसा परतावा मिळाला नाही, कारण शेअर बाजार खाली आला. त्यामुळे काही गुंतवणूकदार लगेच घाबरून, ‘आपण केलेली गुंतवणूक बरोबर नाही,’ असे बोलायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार हे सोईस्करपणे विसरतात, की आपण शेअर बाजाराशी निगडित असलेल्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करीत आहोत. म्हणजे मला परतावा शेअर बाजाराप्रमाणे हवा; पण जोखीम शेअर बाजाराची नको, ही मानसिकताच मुळात चुकीची आहे.

मागे काही वर्षांपूर्वी पण असाच एक मोठा कालावधी येऊन गेला. बघूया त्यामध्ये काय झाले होते ते! सोबतचा तक्ता हा ‘निफ्टी’ या निर्देशांकाचा आहे. यातील प्रत्येक आयत हा दर सहा महिन्याचा चढ-उतार दर्शवितो. या चित्रात पिवळ्या रंगाच्या ज्या दोन उभ्या रेषा मारल्या आहेत, तो जुलै २००७ ते जुलै २०१३ चा कालावधी आहे. आपण पाहू शकता, की या सलग पाच वर्षांत शेअर बाजार आहे तिथेच होता; वर गेलाच नाही. पर्यायाने शेअर बाजाराशी निगडित असलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेतही परतावा मिळाला नाही. या पाच वर्षांत सरासरी वार्षिक परतावा हा फक्त एक टक्का होता. म्हणजे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षाही खूप कमी! त्यावेळेस बँकेच्या मुदत ठेवींवर ८ ते ८.५ टक्के परतावा मिळत असे आणि या पाच वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा शेअर बाजाराने २०१४ मध्ये उसळी घेतली, त्यानंतर जर आपण पाहिले, तर सहा वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा २४ टक्के होता आणि बँकेच्या मुदत ठेवींचा व्याजदर ७.५ टक्केच राहिला. ज्या गुंतवणूकदारांनी या कालावधीमध्ये आपली गुंतवणूक चालू ठेवली,

त्यांना या कालावधीत ज्या महिन्यात बाजार वर गेला, तेव्हा कमी युनिट्स मिळाली आणि ज्या महिन्यात बाजार खाली आला, तेव्हा जास्त युनिट्स मिळाला. म्हणून त्यांची गुंतवणुकीची सरासरी खरेदीची किंमत नेहमीच खाली राहिली; कारण ते गुंतवणूकदार दर महिन्याला सातत्याने एका विशिष्ट रकमेची (एसआयपी) गुंतवणूक करत होते आणि यालाच ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ असे म्हणतात. त्या गुंतवणूकदारांनी सलग पाच वर्षे शेअर बाजारातील चढ-उताराकडे न बघता सातत्यपूर्ण गुंतवणूक केली आणि संयम ठेवला; म्हणूनच त्यांना २०१४ पासून आतापर्यंत त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा दिसत आहे. २०१४ नंतर ते आतापर्यंत शेअर बाजार किती वर गेला आहे, ते आपणास सोबतच्या तक्त्यातून दिसत आहे. शेअर बाजार न हलणाऱ्या कालावधीत केलेल्या पाच वर्षांतील गुंतवणुकीला आपण ‘ॲक्युमिलेशन झोन’ म्हणू शकतो.

थोडक्यात, काही काळ परतावा मिळाला नाही म्हणून घाबरून जाऊन, नाराज होऊन आपली ही दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक मध्येच बंद करू नका. कानावर पडणाऱ्या नकारात्मक बातम्यांकडे दुर्लक्ष करून आपली गुंतवणूक चालू ठेवा. मी पुन्हा सांगेन, पुन्हा सांगेन, पुन्हा सांगेन, की नियमित गुंतवणूक आणि संयम हेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून समृद्ध होण्याचे खरे सूत्र आहे!

(लेखक अनुभवी म्युच्युअल फंड सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com