'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब

Term insurance
Term insurance

अलीकडच्या काळात बहुतांश नागरिक आयुर्विम्यासंदर्भात परिचित झालेले आढळून येतात. मात्र नेमका कोणता आयुर्विमा घ्यावा, विमा संरक्षण किती असावे याबद्दल मात्र अजूनही बरेचशे गैरसमज दिसून येतात. अनेक व्यक्ती विम्याकडे गुंतवणुकीचाच एक प्रकार म्हणून बघतात. तर अनेकांसाठी विमा म्हणजे प्राप्तिकर बचत करण्याचे साधन असते. मात्र हा चुकीचा किंवा अपरिपक्व दृष्टीकोन आहे. आयुर्विम्यासंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया.

1) आयुर्विमा हा गुंतवणुकीसाठी, प्राप्तिकर बचतीसाठी नसतो तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी असतो. प्राप्तिकर बचत हा त्यामुळे मिळणारा एक अतिरिक्त लाभ आहे. प्राप्तिकर बचत हा आयुर्विम्याचा मुख्य हेतू नव्हे. अलीकडे खासगी विमा कंपन्यांच्या जाहिरातींमुळे, प्रमोशनमुळे आयुर्विम्याचा प्रसार वाढलेला आहे. आयुर्विमा घेताना काही बाबींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

2) आयुर्विमा घेण्याचा मुख्य उद्देश आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक गरजांची काळजी घेणे हाच असतो. कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर अनेक पातळ्यावर संकट येते. भावनिक, मानसिक संकट हे तर न भरून येणारे, मात्र अशा वेळी व्यक्ती गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून त्या कुटुंबाला आर्थिक गरजा भागवण्यासाठी जमवाजमव करण्याची वेळ येते. कमावती व्यक्तीच गेल्यामुळे नियमित मासिक उत्पन्न थांबलेले असते. त्यामुळे दर महिन्याचा खर्च, मुलांचे शिक्षण इतर खर्च याची जुळवाजुळव करणे कठीण होऊन बसते. अशा वेळी आयुर्विम्याची रक्कम आपल्याला आर्थिक आधार देते. अन्यथा बचत केलेली सर्वच रक्कम खर्ची पडून आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ त्याक कुटुंबार येते. 

3) आर्थिक नियोजन हे जीवनात आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आयुर्विमा हाही त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र आयुर्विम्यासंदर्भात बाजारात विविध विमा कंपन्या, विविध पॉलिसी विकताना दिसतात. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांवर आर्थिक संकट येऊ नये हेच आयुर्विम्याचे मुख्य उद्दिष्ट असते.

4) वरील मुद्दा लक्षात घेतल्यावर टर्म लाईफ इन्श्युरन्स हाच आयुर्विम्यासाठीचा योग्य पर्याय ठरतो. टर्म इन्श्युरन्ससाठी तुलनात्मकरित्या छोट्या प्रिमियममध्ये मोठे विमा संरक्षण मिळते. अर्थात हा टर्म इन्श्युरन्स असल्यामुळे कालावधी संपल्यानंतर प्रिमियमची रक्कम किंवा विशिष्ट रक्कम परत मिळण्याची सुविधा यात नसते आणि अर्थातच तो विमा घेण्यामागचा हेतूदेखील नसावा.

5) साधारणपणे 25 वर्षांवरील आणि 60 वर्षांखालील व्यक्तींना विम्याची सर्वाधिक आवश्यकता असते. अर्थात हे ढोबळमानाने लक्षात घेतलेले वय आहे. प्रत्येक कुटुंबाची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे यात बदल होऊ शकतात. थोडक्यात ज्याच्यांवर कुटुंबातील इतर सदस्य आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत त्यांना आयुर्विम्याची आवश्यकता असते.

6) आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या साधारण 10 ते 12 पट इतके विमा संरक्षण असावे. अर्थात कुटुंबाच्या गरजा आणि परिस्थिती लक्षात घेता ही रक्क्म अधिकदेखील असू शकते. विमा संरक्षणाच्या रकमेतून आपला मासिक खर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या इतर गरजांची काळजी घेतली जावी हा मुख्य हेतू असतो. त्यामुळेच विमा संरक्षण घेताना वार्षिक उत्पन्न लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.

7) टर्म इन्श्युरन्समध्ये ग्राहक विम्याचे हफ्ते भरून विमा संरक्षण मिळवतो. या कालावधीत विमेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जोखीम रक्कम मिळते; मात्र मुदतीनंतर विमेदार हयात असल्यास कुठलीही रक्कम परत मिळत नाही. ज्या पॉलिसीमध्ये अपेक्षित जोखीम संरक्षण कमीत कमी हप्ता भरून होईल अशीच पॉलिसी घ्यावी. अशा प्रकारची पॉलिसी आपल्याला टर्म इन्शुरन्सच्या रुपानेच मिळते. कारण यात खर्च कमीत कमी व फायदा जास्त असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com