भानावर या, नाहीतर ही पोरं तुमची सत्ता पालपाचोळ्या सारखी उडवून लावतील...

mpsc student.jpg
mpsc student.jpg

डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन दिवसाची सुरुवात करणारा, वाचताना दररोज एकदा तरी तो स्वतःचा भूतकाळ आठवतोच... काळा भूतकाळ अन् सोनेरी भविष्याची कल्पना करत कितीतरी वेळ बसतो. बस एकदाच पास झालो की संपलं सगळं...सात पिढ्यांचे दरिद्र्य मिटणार, लोक इज्जत देणार, कोणासमोर हात पसरावे नाही लागणार मग त्या दुपारच्या कडाक्याच्या उन्हात सळसळतात त्याच्या धमन्या, मग त्याला लोखंडात सुद्धा दिसू लागते सोने...आपल्याला अंतर काटल पाहिजे. या धुंदीत त्याच्या अंगातील ज्वालामुखी खवळतो पण दिवस मावळतीला आलेला असतो. अंतर अजून बरच कटायच असत, स्पर्धा फार मोठी त्यात चेंगरून जाण्याची भीती... तरीही रस्त्याच्या फार पुढे आपण आलो आहोत याची जाणीव होते.

रस्त्याचं पहिल पाऊल आठवलं की प्रचंड वेदना होतात. येथे मात्र त्याचा पुरता गोंधळ उडून जातो. पाठीमागे वेदना आणि पुढे आशा या द्विधा मनस्थितीत असताना तो आशेला प्राधान्य देतो अन् येथून सुरू होतो त्याचा झुंझार प्रवास, बेधुंद, आरपारची लढाई , त्याला एवढा दम लागतो की याची छाती फुटते की काय अस त्याच्या हितचिंतकांना वाटतं. त्याला रोखण्यासाठी बरेच मायेचे प्रयत्न होतात. बरेच जण विनवण्या करतात. बस कर राजा तू लढलास वाघासारखा तुला पाहून जीव तुटतो..रे .. मग आई समजावते बबड्या थांब तू लढला प्रतापराव गुजर यांच्यासारखा....

तू म्हणजेच माझा हिरा आहे. वाट बदल तुला यश येईल. प्रत्येक लढाईत माणूस जिंकत नसतो. वाट बदल हा शब्द एकूण भीतीचे शहारे अंगावर सळसळतात. पुन्हा नवीन वाट.. पुन्हा तोच जोर ..दाखवायचा छे शक्य नाही हे... रात्रीचा काळोख पाहून तो प्रचंड खवळतो. स्वतःला त्याने पूर्णपणे हरवलेले असते त्याच्याकडे फक्त आता काही वेळ शिल्लक  राहिलेला असतो . तो प्रचंड इर्षेला पेटलेला असतो...जिंकू किंवा मरू अशा घनघोर लढाईसाठी तो सज्ज असतो. डोळ्यात पाणी आणून जीवाची बाजी लावून तो लढतो त्याची ही लढाई कित्येक वेळ चाललेली असते. पाच लाख मुलं या मानसिक अवस्थेत मधून दररोज जात असतात. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अतिशय साधारण असते. बहुतांश आई-वडील पोटाला चिमटा काढून पैसे देतात. बरेच जणांचे आई-वडील तर कर्ज तसेच अधिक व्याजाने पैसे काढणे, जमिनी गहाण ठेवणे, घर विकणे असे प्रकार करतात आणि सर्वस्व या स्पर्धा परीक्षेतील मुलांवर लावतात.

२०१४ पासून स्पर्धा परीक्षेला फार वाईट दिवस आले. दोन- दोन वर्षे नोकर भरतीच होत नव्हती. तत्कालीन फडवणीस सरकारला कमीत कमी प्रशासनात काम करायचं होतं.. या स्पर्धा परीक्षांमधून त्यांना बाहेर पोर काढायची होती. काढली त्यांचा हेतूही सफल झाला पण ती पोर बाहेर येउन काय करतात ते फक्त उघड्या डोळ्यांनी पहा.. कित्येक मुलं आज पुणे शहर व महाराष्ट्र भर वॉचमनचा जॉब करत आहे. तुम्ही फर्ग्युसन कॉलेज , गरवारे कॉलेज, एसपी कॉलेजमध्ये जावा, प्रत्येक एटीएममध्ये जावा. यामध्ये 70 टक्के मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी वॉचमनचा जॉब करतात. किती मुलांनी चहाचे स्टॉल लावले, काही गावाकडे निघून गेली बाप जसा आत्महत्या करून गेला त्याच वाटेवर पुन्हा चालायला. पण तुम्हाला काय देणं घेणं कुणाचं....

या पाच लाख पोरांनी ठरवलं फडवणीस सरकार घालवायचच म्हणून पोर इर्षेने मैदानात उतरली. अन् सरकार घालवायला जितकी मदत करता येईल तेव्हढी मदत केली. त्यानंतर ठाकरे आणि पवार यांच सरकार आलं. बस आल्यापासून ते घोषणेतच दंग झालेत. कोणाचाच कोणाला मेळ नाही. गेली सहा महिने झाले मुलं परीक्षेची चातकाप्रमाणे परीक्षेची वाट पाहत बसली आहेत पण तुम्ही त्यांच्याकडे डुंकूननही पाहायला तयार नाही. तुम्ही तुमच्याच सत्तेत मश्गुल झाला आहात. या पोरांना आज कोणीही वाली नाही.... लक्षात ठेवा जर या पाच लाख पोरांनी ठरवलं ना...तुमची सत्ता पालपाचोळ्या सारखी उडून जाईल. या पाल्याला जाळ लागायच्या आधी आवरा नाहीतर वाऱ्याच्या वेगाने रान पेटल्याशिवाय राहणार नाही .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com