Coronavirus- युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

jaun carlos
jaun carlos

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीने स्पेनने आता इटलीलाही मागे टाकले आहे. साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्पेनमध्ये सध्या १ लाख ५८ हजार रुग्ण आहेत. आतापर्यंत तब्बल १६ हजार जणांनी जीव गमावलाय. युरोपीय देश कोरोनाचे संकट समोर आले तेव्हा बेफिकीर राहिले. उद्रेक वाढताच हालचाली केल्या. या संकटाच्या मुकाबल्यासाठी आता युरोपातील सर्व देशांनी संयुक्त कृती करायला हवी, अशी अपेक्षा स्पेनमधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. जॉन कार्लोस यांनी व्यक्त केलीय. यासंदर्भात ‘सकाळ’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. 

प्रश्न - स्पेन सरकार काय उपाययोजना करतेय? 
डॉ. जॉन कार्लोस - १६ मार्चपासून स्पेनमध्ये लॉकडाऊन आहे. कदाचित, आम्ही मे महिन्यापर्यंत घरीच बंद राहू. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आणि सैन्य रस्त्यावर उतरलेय. सरकारच्या नियमांचे पालन न केल्यास आता कठोर कारवाई केली जातेय. बाहेर पडल्यास १०० ते ६०० युरो (आठ ते ५० हजार रुपये) दंड वेगवेगळ्या प्रकरणांत होऊ शकतो. त्यामुळे आता नागरिकही नियमांचे काटेकोर पालन करताहेत. 

प्रश्न - युरोपातील देशांचे सरकार कोठे चुकले? 
डॉ. जॉन कार्लोस -  मी हे संकट व्यवस्थापित करताना दोन चुका पाहिल्या आहेत. काही सरकारांनी नियोजन करताना उशीर लावला. प्रत्येक देशाने या संकटाविरुद्ध वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, सर्व युरोपीय देशांनी संयुक्त कृती केली पाहिजे. 

प्रश्न - स्पॅनिश नागरिकांचा दिनक्रम कसा आहे? 
डॉ. जॉन कार्लोस - मी रसायनशास्त्रात पीएच.डी. केली आहे. ‘कोविड १९’मुळे सध्या घरून काम करतोय. मी हायस्कूलच्या व्यवस्थापनात आहे. सकाळी व दुपारी मी ऑनलाइन काम करतो. उर्वरित वेळ माझी मुलगी आणि मुलासमवेत घरी व्यायाम करणे, चित्रपट पाहण्यात घालवतो. कधीकधी सकाळी मी कार्यालयात जातो. आठवड्यातून दोन दिवस खरेदी करतो. मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझरचा वापर करतोय. मी पत्नीसह मुलगा (वय १४) व मुलगी (वय १२) घरातच असतो. मुलांचा अभ्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू आहे. 

प्रश्न - तुम्ही भारताकडे कसे पाहताय? 
डॉ. जॉन कार्लोस ः साथीच्या रोगानंतर आर्थिक समस्येवर तोडगा काढावा लागेल. मी आठवड्यातून दोन-तीन वेळा भारतातील शिक्षक मित्र आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधतो. सुरक्षित राहा आणि शासकीय नियमांचे अनुसरण करावे, अशी विनंती करतोय. स्पॅनिश पर्यटकांना भारतातून परत येण्यासाठीच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. 

प्रश्न - कोरोना विषाणूचे संकट किती काळ टिकेल? 
डॉ. जॉन कार्लोस -
मला वाटते की आम्ही दोन महिने तरी सामान्य परिस्थितीत परत येणार नाही. आरोग्य आणीबाणी राहील. आर्थिक मंदी येईल. सर्वच क्षेत्रांवर परिणाम होऊन बेरोजगारी वाढेल. युरोपातील नागरिकांच्या मूलभूत उत्पन्नाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com