Coronavirus: महाराष्ट्रात जमावबंदी; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहणार!

coronavirus maharashtra cm uddhav thackeray article 144 lockdown
coronavirus maharashtra cm uddhav thackeray article 144 lockdown

मुंबई Coronavirus : कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका लक्षात घेऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केलीय. जनात कर्फ्यु संपल्यानंतर अवघ्या तीन तासांत राज्यात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्यात पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या निर्णयांविषयी माहिती दिली. आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करत असल्याचे सांगून ते म्हणाले, 'कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आपण आता पुढची पावले टाकत आहोत. सर्वांत कठीण काळ आता सुरु झाला आहे. आज, जनता कर्फ्यु यशस्वी करताना नागरिकांनी जी जिद्द दाखविली आहे ती पुढेही दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. त्याचबरोबर रेल्वे, खासगी बसेस , एसटी बसेस बंद करत आहोत. त्याचवेळी जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील. शासकीय कार्यालयांत आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.' ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे, त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी १५ दिवस घराबाहेर पडू नये आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. 

या सेवा सुरू राहणार

  • अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने  
  • सरकारी तसेच खासगी दवाखाने
  • बँका, वित्तीय संस्था, सरकारी कार्यालये 
  • सर्व प्रार्थनास्थळांमध्ये पूजा सुरु राहील पण, भाविकांसाठी बंद 

दरम्यान, राज्यात कोरोनाची चाचणी केंद्रे वाढवण्यात येत आहेत. तसेच ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर, निर्णय घेण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. कामगारांना, तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यापासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. पण, काळजी घेताना माणूसकी बाळगा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

काय आहे कलम 144?
कलम 144 हे नागरिकांच्या सुरक्षेसंबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केले जाते. जिल्हाधिकाऱ्यांनाही कलम 144 लागू करण्याचे अधिकार आहेत. या कलमानुसार पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येत नाही. कलम 144 लागू असले तर कोणत्याही प्रकारचे आंदोलन, निदर्शने करता येत नाहीत. संचारबंदी आणि जमावबंदी यात खूप फरक असतो. सर्वसामान्यांचा त्यात गोंधळ होतो. सरकारने संचारबंदी नाही तर, जमावबंदी जाहीर केली आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळं एखाद्या अत्यावशक कामासाठी घरातून बाहेर पडणे शक्य आहे. परंतु, पाच पेक्षा जास्त व्यक्तींचा समूह रस्त्यावर दिसला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com