Ashadhi Ekadashi 2023 : एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडावा? जाणून घ्या

सर्व व्रतांमध्ये महत्वाचे सजले दाणारे एकादशीचे व्रत असते.
Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023esakal

Why Ekadashi Fast Leave On Dwadashi : शास्त्रानुसार एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे व्रत समजले जाते. हा उपवास एकादशीच्या संपूर्ण दिवसभराचा असून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडावा असं शास्त्रात सांगितलं जातं. असं का?

सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुमाऊलीच्या प्रेमासाठी हे व्रत अनेक भाविक, वारकरी नियमित करत असतात. याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेक जण करतात. पण या व्रताचे काही नियम आहेत. त्यातीलच एक म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो.

एकादशी उपवासाचे मुख्य दोन प्रकार आहेत, स्मार्त आणि भागवत. बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धत मानतात. तर स्मृतींना मानणारे लोक स्मार्त एकादशीचे व्रत करतात.

एकादशीचा उपवास का करतात?

एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत. त्यातलीच एक देव दानव युद्धाची कथा आहे. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपड मिळवलं. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्वांपेक्षा तो बलवान झाला होतो. त्याच्या भीतीने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते. त्या दिवशी एकादशी होती. त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली.

त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं. ही शक्ती म्हणजे एकादशी असं सांगण्यात येतं. एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी त्याचा अर्थ जन कल्याण एवढाच आहे.

उपवास द्वादशीलाच का सोडतात?

एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं मानलं जातं. हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.

द्वादशीचं वारकरी संप्रदायातलं महत्व

द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्व आहे. या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो. एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जातात. आणि उपवास सोडतात.

याची कथा

अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत रत असे. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत. एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन नदीवर गेले. सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला.

अखेर त्यांनी थेंब भर पाणी पिऊन उपास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले. अंबरीश ऋषींना १० जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला. आणि त्यांनी दहा अवतार घेतले, अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com