बरड : आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी वारकरी विद्यार्थ्यांवर लाठीमार झालेला नाही. मात्र, जी घटना घडली त्याची चौकशी करू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस हे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. आळंदीत वारकरी आणि पोलिस यांच्यात झटापट आणि लाठीमार झाल्याची राज्यभर चर्चा झाली. पालखी मार्गावर लोणंद येथील तळावरही दिंडी समाज संघटनेच्या बैठकीतही झालेल्या घटनेमागचा सूत्रधार कोण या बाबत देवस्थान आणि राज्य सरकारने पाठपुरावा करावा ही मागणी केली होती. या बाबत बरड येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी उत्तर दिले.
फडणवीस यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. रथाचे सारथ्यही त्यांनी केले. त्यावेळी फडणवीस म्हणाले, ‘‘मला रथाचे सारथ्य करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. पद कुठलेही असो माऊलींकडे आलेला प्रत्येक व्यक्ती वारकरी आहे. तो मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री. सामान्य माणूस असो वारकरी, इथे सगळे वारकरीच. हीच माऊलींची पुण्याई आहे.
वारीत आत्मिक आनंद मिळतो, वारीत चालणारी माणसे पुण्यवान आहेत. वारकऱ्यांचे थोडे पुण्य आपल्यालाही मिळो. आपल्या मनात जे असते ते माऊली करीत असते. मीही केवळ आशीर्वाद मागितला. आषाढी वारीत जाणवणाऱ्या त्रुटी महिनाभरात बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल.’’
वारीत उन्हाच्या पार्श्वभूमीवर ओआरएसचा पुरवठा करण्याची मागणी चैतन्य महाराज कबीर आणि संजय घुंडरे यांनी फडणवीस यांच्याकडे केली.यावेळी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, बैलजोडी मालक संतोष भोसले, सागर भोसले होते. या वेळी रथाजवळ सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर, शिवेद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा रथाला सामोरा गेला होता. यावेळी त्यांचा ताफा काढून देण्यासाठी काही काळ दिंड्या थांबविण्यात आल्या होत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.