Video : आसाममध्ये तेल विहिरीला भीषण आग; दुर्घटनेत एका माजी फुटबॉलपटूचा मृत्यू!

Assam_Oil_Fire
Assam_Oil_Fire

गुवाहाटी : आसाममधील तिनसुकियामधील एका सरकारी गॅस कंपनीच्या विहिरीला भीषण आग लागली आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एकजण हा माजी फुटबॉलपटू असल्याची माहिती समोर आली आहे. 

दुरलोव गोगोई असं या फुटबॉलपटूचं नाव असून त्यांनी १९ वर्षाखालील आणि २१ वर्षांखालील आसाम संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमीतकमी ४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑइल इंडियाचे प्रवक्ता त्रिदिव हजारिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे समजताच सर्व कामगारांनी घटनास्थळाहून पोबारा केला आहे. एनडीआरएफच्या एका टीमने दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून या दोघांची नावे दुरलोव गोगोई आणि टीकेश्वर गोहेन अशी आहेत. आगीवर नियंत्रण आणताना ओएनजीसीचा एक कर्मचारीही जखमी झाला आहे. 

१५ दिवसांपासून होतेय गॅस गळती 
गेल्या १५ दिवसांपासून येथे गळती होत होती. त्यामुळे ही आग लागली आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह पाणी असलेल्या भागात सापडले असून त्यांच्या शरीराला आग लागल्याची कोणतीही चिन्हे दिसून आली नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती हजारिका यांनी दिली. 

दरम्यान, या भीषण आगीमुळे आसपास असलेल्या जंगलाचा काही भाग, घरे आणि वाहने यांनाही आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. या गोंधळाच्या स्थितीमध्ये काही स्थानिक नागरिकांनी ऑइल कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामध्ये काही कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. 

केंद्र सरकारकडे मदतीची विनंती
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या घटनेची माहिती फोनवरून दिली. तेव्हा पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री सोनोवाल यांना दिले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि घरातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशी विनंती सोनोवाल यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना केली आहे. 

भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. मात्र, भीषण आग आणि तापमान यांमुळे यामध्ये व्यत्यत येत आहे. ओआयएल, भारतीय सेना, वायुदल, आईओसी आणि आसाम गॅस कंपनीचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत आहेत. 

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लागू शकतो एक महिना
सिंगापूर स्थित 'अलर्ट डिझास्टर कंट्रोल'चे तज्ज्ञ आणि संरकारी कंपनीचे तज्ज्ञ यांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते, असा विश्वास सिंगापूरच्या एका तज्ज्ञाने व्यक्त केला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमीत कमी चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज ऑइल इंडियाने वर्तविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com