नवी दिल्ली- हिवाळा सुरु होताच आपल्या अंतर्गत मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) तणाव वाढवला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्कराच्या एका आघाडीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. लष्कराच्या 15 व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) लाँच पॅडवर 200 ते 250 दहशतवाद्यांचा वावर आहे. ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
सामारिकदृष्ट्या महत्त्वाची ही कोअर नियंत्रण रेषेजवळ निगराणी ठेवण्यासाठी आणि दूरवर्ती भागात दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी जबाबदार आहे. लष्कराच्या आघाडीच्या कमांडरने नुकताच झालेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकांबाबत चर्चा केली आणि शांततापूर्ण पद्धतीने निवडणुका झाल्याने आनंद व्यक्त केला. लोकशाही मजबूत करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील लोक मत देण्यास बाहेर पडले होते. आता निवडून आलेल्या प्रतिनिधींवर हे अवलंबून आहे की, त्यांनी लोकांसाठी काम करावे आणि लोकही त्यांना विकास करण्यासाठी सांगावे, असे ते म्हणाले.
नियंत्रण रेषेवर हिवाळ्यात कमी उंचीवरच्या भागातील घुसखोरी बाबतही त्यांनी भाष्य केले. पीओकेत 200 ते 250 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले. ते घुसखोरीसाठी खराब हवामानाचा वापर करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, सुरक्षा दल काश्मीरमध्ये एलओसीतून होणारी थेट घुसखोरी आणि पीर पंजालमधील दक्षिण भागातून घुसखोरीवर नजर ठेऊन आहेत. एलओसीवर कडक सुरक्षा व्यवस्था आहे. अनेक स्तरावर निगराणी उपकरणे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
बी एस राजू पुढे म्हणाले की, अंतर्गत मुद्द्यावरुन आपल्या जनतेचे लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान हिवाळ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी करुन किंवा शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन सीमेवर तणाव वाढवू शकते. दोन्ही स्थितीसाठी आम्ही तयार आहोत आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही कृत्याला चोख उत्तर देऊ.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.