नवी दिल्ली - ‘येत्या काळात ‘६-जी’ तंत्रज्ञानामध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘इंडियन मोबाइल काँग्रेस’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केला. देशभरातील शंभर शैक्षणिक संस्थांचा यावेळी ‘फाइव्हजी यूज केस’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम्’ मध्ये तीन दिवस ही ‘इंडियन मोबाइल काँग्रेस’ चालणार असून २२ देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एका प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.
दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाच्या प्रगतीची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या क्षेत्रातील स्टार्टअप्स तसेच विविध प्रकारचे सोल्यूशन प्रदाते या संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र आले आहेत. ‘‘ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने जे बदल होत आहेत, ते पाहून आपण ‘दि फ्यूचर इज हिअर अँड नाऊ’ असे म्हणतो. आगामी भविष्याची झलक या प्रदर्शनात दिसत आहे. दूरसंचार, तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटी, ‘६ - जी’, एआय, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर, ड्रोन तसेच अंतराळ क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. आनंदाची बाब ही आहे की, देशाची युवा पिढी तंत्रज्ञानाचे नेतृत्व करीत आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हणाले.
ते नव्या पिढीला माहिती नसेल
‘ केवळ ‘५ - जी’ नव्हे तर ‘६ - जी’ तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत जागतिक नेतृत्व करेल,’’ असे सांगत मोदी पुढे म्हणाले, ‘‘टू- जी च्यावेळी काय झाले हे कदाचित नव्या पिढीला माहिती नसेल. आपण त्याचा फारसा ऊहापोह करणार नाही कारण त्यालाच जास्त प्रसिद्धी दिली जाईल. आमच्या सरकारच्या काळात ‘४ - जी’ चा विस्तार झाला, पण सरकारवर एकही डाग लागला नाही. इंटरनेटच्या वेगामुळे जीवन सुधारत असून त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना मिळते आहे.’’
ते सरकार हँगमोडमध्ये होते
मोदी म्हणाले, ‘‘ पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. २०१४ हे केवळ वर्ष नसून तो एक बदल आहे. या वर्षाच्या आधी देशात केवळ १०० स्टार्टअप्स होते. ही संख्या आता एक लाखाच्या आसपास आहे. खूप कमी काळात युनिकॉर्नचे शतक मारले गेले. जगातील पहिल्या तीन स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये भारताचा समावेश झाला आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इंडियन मोबाइल काँग्रेस’ ने अस्पायर नावाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. साधारणपणे दहा ते बारा वर्षेआधीचा विचार करा त्यावेळी कालबाह्य झालेल्या मोबाइल फोनची स्क्रिन वारंवार हॅंग होत असे. तुम्ही कितीही वेळा हलविला तरी त्यात काही बदल होत नसे. त्यावेळच्या सरकारची स्थितीही तशीच होती. त्यावेळचे सरकार असो अथवा अर्थव्यवस्था दोन्ही ‘हॅंगमोड’ मध्ये गेले होते.’’
क्षमता वाढवावी लागेल
‘‘जगातील बड्या मोबाइल कंपन्या भारतात मोबाइल उत्पादन करीत आहेत. मोबाइल उत्पादनाच्याबाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची क्षमता अजून वाढविण्याची गरज आहे. विकासाचा लाभ समाजाच्या प्रत्येकस्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळण्याबरोबरच त्यांना सन्मानजनक जगता यायला हवे यासाठी आम्ही काम करीत आहोत,’’ असेही मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले. या कार्यक्रमाला रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्यासह मोबाइल, दूरसंचार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.