Breaking : अम्फान चक्रीवादळानं बंगालमध्ये घातलं थैमान; आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू!

Amphan-Cyclone
Amphan-Cyclone

कोलकाता : बंगाल उपसागरात आलेल्या अम्फान या महाचक्रीवादळाने भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बंगालमधील ७२ नागरिक या चक्रीवादळाचे बळी ठरले आहेत. 

चक्रीवादळाने अनेक घरांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांबही उन्मळून पडले आहेत. अम्फानमुळे झालेले नुकसान हे कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानापेक्षा अधिक असल्याचे मत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये येऊन राज्यातील परिस्थितीची पाहणी करावी, असे आवाहन केले आहे. 

या पूर्वी कधीही न पाहिलेली हानी 'सर्वनाश' असे वर्णन ममता यांनी केले आहे. झाड अंगावर पडल्याने तसेच विजवाहक तारांचा शॉक लागल्याने ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १५ जण हे कोलकाता शहरातील आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. 

या चक्रीवादळामुळे बंगालमधील कोलकाता, हुगळी यांसह उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांत मोठे नुकसान केले आहे. उत्तर २४ परगणामधील जवळपास ५ हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून पायाभूत सुविधांची हानी झाली आहे.  

दरम्यान, संपूर्ण देश बंगालच्या पाठीशी उभा आहे. आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्यात कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. नुकसानभरपाईचे आढावा घेण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी गृह मंत्रालयातर्फे पथक पाठविले जाणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळाने जोर धरला असून सध्या १८५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे बंगालमध्ये आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तीचे नुकसान झाले असल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. कोलकाता विमानतळामध्ये पाणी साचले असल्याने विमानतळही बंद ठेवण्यात आले आहे. 

सर्वाधिक हानी करणाऱ्या वादळांमध्ये अम्फानचा समावेश करण्यात आला आहे. १९९९ नंतर आलेले हे दुसरे महाचक्रीवादळ आहे. १९९९ साली आलेल्या महाचक्रीवादळाने ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला होता. यामध्ये १० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com