Bali Yatra : ‘बाली यात्रे’ला जागतिक ओळख मिळणार

कटकमध्ये तयारी : दहा हजार होड्या बनविणार; गिनिज बुकमध्ये नोंदीचा प्रयत्न
bali jatra to enter guinness world records Bali Yatra get global recognition
bali jatra to enter guinness world records Bali Yatra get global recognitionsakal

भुवनेश्‍वर : ओडिशाच्या समृद्ध सागरी इतिहासाचे स्मरण करणारा प्रसिद्ध बाली जत्रा उत्सव संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कटक शहरात हा उत्सव आठवडाभर साजरा होता. यंदा ८ नोव्हेंबरपासून (कार्तिक पौर्णिमा) सुरू होणाऱ्या बाली जत्रेची नोंद ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार आहे. बाली जत्रेच्या आयोजनाची तयारी कटकमध्ये सुरू झाली आहे. विश्‍व विक्रमासाठी १५ मिनिटांत दहा हजार कागदी होड्या तयार करण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. कटक महानगरपालिकेने लंडनमधील ‘गिनिज बुक’च्या मुख्यालयाशी संपर्क साधला होता. उत्तरादाखल या जत्रेच्या विक्रमाची नोंद करण्यासाठी उत्सवाच्या नियोजन कशा प्रकारे करावे, याची नियमावली पाठविण्यात आली आहे. यात होड्यांचा विहित आकार आणि वजन यांचे प्रमाण नमूद केले आहे.

बाली यात्रा याचा अर्थ ‘बालीपर्यंतचा प्रवास’ (आतचा इंडोनेशिया) असा आहे. कलिंगला त्याच्या काळातील सर्वांत समृद्ध साम्राज्य बनविणाऱ्या तज्ज्ञ खलाशांचे चातुर्य आणि कौशल्याला या उत्सवाद्वारे वंदन केले जाते. प्रत्येक वर्षी कार्तिक पौर्णिमेला समुद्रामार्गे व्यापार करणारे व्यापारी या दिवशी इंडोनेशियाकडे कूच करतात. गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण करण्यासाठी राज्यभरातून नागरिक रंगीबेरंगी पोशाख करून या उत्सवात सहभागी होण्यासाठी कटकला येतात. यात्रेदरम्यान महिला कागदी किंवा केळीच्या पानांपासून नावा करून त्यात दिवे प्रज्वलित करून महानदीत सोडतात. विविध प्रकारचे पाळणे, स्टॉल, खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या यात्रेत असते.

महानंदी नदीच्या किनाऱ्यावर दरवर्षी भरणाऱ्या या खुल्या यात्रेला जागतिक ओळख मिळावी म्हणून या विश्‍वविक्रमाची नोंद करण्याचे कटक महापालिकेचे उद्दिष्ट आहे. दहा हजार होड्यांची पाहणी करण्यासाठी ‘गिनिज बुक’च्या लंडनमधील कार्यालयातून दोन परीक्षक आणि मुंबई शाखा कार्यालयातून पाच सदस्यांचे पथक उत्सवाच्या काळात कटकला येणार आहे. विक्रमासाठी होड्या बनविण्याचे प्रशिक्षण नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. जत्रेतील मुख्य कार्यक्रमापूर्वी दोन वेळा रंगीत तालीमही होणार आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

ओडिशातील तत्कालिन कलिंगा साम्राज्य हे समृद्ध सागरी इतिहासासाठी प्रसिद्ध होते. कलिंगा राजाने ‘बोयटाज’ नावाची भव्‍य जहाजांची निर्मिती केली होती. त्याद्वारे बालीशी व्यापार चालत असे. ‘बोयटाज’च्या सततच्या वाहतुकीमुळे त्यावेळी बंगालच्या उपसागराला ‘कलिंगा सागर’ या नावाने ओळखले जात असे. व्‍यापार करीत असताना ओडिशाचे काही व्यावसायिक बालीत स्थायिक झाले होते. यातून त्या प्रदेशात हिंदू धर्माचा प्रसार झाला. ‘बाली हिंदूं’चे तेथे प्राबल्य आहे. शिवरात्री, दुर्गा व सरस्वती पूजा असे सण आणि उत्सवही साजरे केले जातात. तेथील ‘मसाकापन ते टुकड’ हा उत्सव ओडिशातील बाली यात्रेसारखाच असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com