Bengaluru News : विरोधी ऐक्यावर आज बंगळूरमध्ये मंथन; सोनिया गांधी बैठकीसाठी दाखल

बंगळूर - येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘एकता बैठकी’साठी २४ विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.
Sonia Gandhi
Sonia Gandhisakal

बंगळूर - येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘एकता बैठकी’साठी २४ विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते सोमवारी बंगळूरमध्ये दाखल झाले.

दरम्यान, सोमवारी रात्री आयोजित केलेल्या स्नेहभोजनप्रसंगी औपचारिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करून विरोधी नेत्यांची अधिकृत बैठक उद्या (ता. १८) होणार असल्याचे काँग्रेससूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज एचएएल विमानतळावर आलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांचे स्वागत केले.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे एचएएल विमानतळावर अवजड व मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वागत केले. विरोधी पक्षांच्या महाआघाडीची सोमवारी आणि मंगळवारी बंगळूर येथे बैठक होत आहे. त्यात २४ विरोधी पक्षांचे ४९ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, लालू प्रसाद यादव, नितीशकुमार हेही विशेष विमानाने येणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विरोधी पक्षांची अधिकृत बैठक मंगळवारी (ता. १८) होणार असल्याचे सांगितले.

विरोधी पक्षांची एकजूट देशाच्या राजकीय परिस्थितीत ‘गेम चेंजर’ ठरेल, असे काँग्रेसने विरोधकांच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर मत व्यक्त केले आहे. हीच संधी साधत भाजपवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षांना स्वबळावर पराभूत करण्याच्या गप्पा मारणारा भाजप आता भूतकाळातील ‘एनडीए’मध्ये नवसंजीवनी फुंकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही काँग्रेसने केली.

विरोधी पक्षांच्या दोन दिवसीय महत्त्वाच्या बैठकीबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक ‘एनडीए’ची आठवण झाली आहे. एनडीएला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून उद्या (ता. १८) दिल्लीत एनडीएची बैठक बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत एनडीएबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, परंतु काही दिवसांपासून एनडीएची बैठकीची चर्चा ऐकायला मिळत आहे.’

वेणुगोपाल यांची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, ‘राज्यकारभारात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आणि खोटी आश्वासने देऊन फसवणूक करणाऱ्या भाजपला जनताच योग्य धडा शिकवेल. आम्ही २६ विरोधी पक्षांनी एकजुटीने पुढे जाण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच हुकूमशाही भाजप सरकारपासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेत आहोत.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे दरोडेखोर एकत्र येत आहे. त्यांना कोणतीही विचारधारा नाही. मोदी हेच विरोधी नेत्यांचे लक्ष्य आहे, विरोधकांना कोणतीही विचारधारा नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी ते एकत्र येत आहेत. राज्यातील जामिनावर असलेली सर्व कुटुंबे एकत्र आहेत. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते नक्कीच तुरुंगात जातील, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे सर्व दरोडेखोर एकत्र येत आहेत.

- बसनगौडा पाटील-यत्नाळ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com