रत्नागिरीत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची स्थिती पाहता रत्नागिरीतील शाळा तसेच महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी देण्यात आली. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने नागरीकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथविधी सोहळा उद्या, सोमवारी ८ जुलै रोजी विधानपरिषदेत होणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
विधानपरिषद निवडणूक आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात होणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे दोन उमेदवार देण्यात आले आहेत. कोणताही दगा फटका या निवडणुकीत होता कामा नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस कडून तयारी करण्यात येत आहे.
सरकारकडून ज्या योजना अर्थसंकल्पात मांडल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत कश्या पोहचाव्यात या संदर्भात बैठकीत रणनीती आखव्यात येणार. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षातील मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
लाडकी बहीण योजने नंतर वाहतूकदार भावासाठी मनसे मैदानात उतरली असून मनसेचे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे, मनसे वाहतूक सेना यांनी रिक्षा टॅक्सी वाहतूकदार यांच्यासाठी बॅनरबाजी केली आहे. मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीला दिलासा दिला लाडक्या वाहतूक भावाला दिलासा कधी देणार? असा थेट प्रश्न बॅनरवरून विचारण्यात आला आहे. वाहनांवरील इ चलन दंडाची रक्कम माफ करा. उत्तर प्रदेश कर्नाटक सरकार इ चलान माफ करू शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही असा आशय बॅनरवर देण्यात आला आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मूळ वेतनात १९% आणि सर्व भत्त्यांमध्ये २५% वाढ करण्यात आली असून वीज कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी ही वेतनवाढ लागू असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.
भारताच्या अभिषेक शर्माने हरारे येथे दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 46 चेंडूत 100 धावांची खेळी केली
वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा वरळी पोलिस स्टेशनच्या ताब्यात आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये उपस्थित असलेला राजेंद्र सिंग यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडे मिहीरबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही असे डीसीपी झोन 3, कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.
भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.
अमरावती शहरातही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. शहरातील इर्विन चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. शहरातील अनेक भागात अर्धा ते एक फूट रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कुडाळ माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आला आहे. पूरात आंबेरी गावातील दत्ताराम भोई नामक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. शोधकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने आजपासून विठुरायाचे 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत दर्शन बारी गेली आहे. जवळपास दहापत्रा शेड पैकी पाच पत्राशेड भरले आहेत. दरम्यान आजपासून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिर समितीच्या निर्णयामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत काल साम टीव्हीने व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांचे हाल अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत.
पाथरी-सेलू महामार्गावर दुचाकी-टेम्पोचा अपघात झाल्याने 45 वर्षीय दत्ता गलबे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना देवेगाव सिमुरगव्हान शिवारात घडली आहे.अपघातास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत छत्रपती संभाजी नगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश झालेला आहे. त्यानंतर राजीव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल घालून स्वागत केले.
जूनच्या मध्यापासून भूस्खलन, पूर आणि वीज कोसळून नेपाळमध्ये किमान 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. ताज्या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 8 जण बेपत्ता झाले आहेत.
वरळी हिट अँड रण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे वरळी पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत.
पनवेलमधील पडघे गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण पडघे गाव पाण्याखाली गेले आहे. रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने गावात पाणी साचले आहे.
राजौरीतील मांजाकोट परिसरात लष्कराच्या छावणीजवळ गोळीबार झाला असून, यानंतर सर्च ऑपरेशन सुरू केले अलल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हातरस चेंगराचेंगरीतील पीडितांसाठी भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी पत्र लिहिले आहे.
मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर आपत्ती निर्माण झाली आहे, परिणामी राज्यभरातील 257 रस्ते बंद झाले आहेत.
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. मात्र, वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणात त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होता. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून चालक मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशी इसमानी बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवलेले 42 भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
खंडाळा : खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्याने आज सकाळी सात वाजेपासून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली. तद्नंतर तासाभरातच बोगद्यातून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झाल्याने आज सकाळपासून दोन्ही बाजूकडे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इथे क्लिक करा
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार रविवारी (ता. 7) सकाळीच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी चालत सहभागी झाले. मुंबईहून बारामतीला विमानाने आलेले अजित पवार हे थेट विमानतळावरुन मोतीबाग येथे पालखी सोहळ्यात सहभागी झाले. तेथून ते काटेवाडीच्या दिशेने चालत निघाले आहेत. सुनेत्रा पवार याही त्यांच्या समवेत निघाल्या आहेत. इथे क्लिक करा
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका असून रस्त्यावर गाड्या अडकल्या आहेत.
यवतमाळच्या वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोट पोहोचत होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुकान मालकाचे लाखोंचे फर्निचर जळून खाक झाले.
रायगड : अलिबाग ते रेवदंडा मार्गावर दोन एसटी बसचा अपघात
नवेदर बेली येथील वळणावर दोन्ही बसेसची समोरासमोर धडक
दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी
दोन्ही बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
अपघातात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान
शहापूर तालुक्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भारंगी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी शहापूर शहरात शिरले आहे, त्यामुळे शहरातील अनेक इमारतींमधील पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले असून, इमारतींमधील अनेक वाहने वाहून गेली आहेत. इथे क्लिक करा
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्यानंतर संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी राजौरी येथील लष्कराच्या तळावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर लष्कराच्या जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवादी जंगलात पळून गेले. लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून छ. संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आज ठाकरे पहिल्यांदाच संभाजीनगर दौरा करत आहेत. शिव संकल्प मेळाव्यातून विधानसभेबाबत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
पंढरपूर : आजपासून विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू असणार आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीने हा निर्णय घेतला. 21 जुलैपर्यंत विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.
मध्य रेल्वेच्या वाशिंद आणि कसारा मार्गादरम्यान लोकल बंद आहेत. वाशिंद ते कसारा लाईनदरम्यान ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मार्गिका बंद आहेत. आज पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड लाईनमध्ये बिघाड झाली आहे.
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने काढलेले ‘सगेसोयरे’चे परिपत्रक लागू करण्यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ‘सगेसोयरे’चे परिपत्रक राज्य सरकारने रद्द करावे यासाठी सरकारवर दबाव आणला असल्याने सरकारची कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता.८) सह्याद्री अतिथीगृहपान येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला प्रामुख्याने ओबीसी नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
Breaking Marathi News Updates 7 July 2024 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये २३ जुलैला अर्थसंकल्प मांडतील. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरले. ‘‘आम्ही राज्य सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने काढलेले ‘सगेसोयरे’चे परिपत्रक लागू करण्यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ‘सगेसोयरे’चे परिपत्रक राज्य सरकारने रद्द करावे, यासाठी सरकारवर दबाव आणला. देशभरातली वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.