नवी दिल्ली : सत्तेतील नऊ वर्षे पूर्ण करणारे मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा हल्लाबोल आज काँग्रेसने केला अाहे. आर्थिक, सुरक्षा, कृषी व शेतकरी, महागाई, भ्रष्टाचार, घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन या सारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारे ‘९ वर्षे ९ प्रश्न’ हे प्रगतिपुस्तक जारी केले.
दरम्यान, उद्या आणि रविवारी (ता. २७ आणि २८ मे) देशातील ३५ शहरांमध्ये काँग्रेस नेते पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या अपयशाचा पाढा वाचतील, असेही काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश, माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेडा, सोशल मीडिया विभाग प्रमुख सुप्रिया श्रीनेत, अमिताभ दुबे यांनी आज ‘२४ अकबर मार्ग’ काँग्रेस मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्ला केला.
अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, कृषी आणि शेतकऱ्यांची अवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, सीमेवर चीनची मुजोरी, घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन, तपास यंत्रणांचा गैरवापर या सारख्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत केंद्र सरकारला प्रश्न विचारले होते. त्यावर पंतप्रधानांनी मौन सोडले नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाइलाजास्तव विचारावे लागत आहेत, अशी खोचक टिप्पणी जयराम रमेश यांनी केली.
पवन खेडा यांनी आजचा दिवस हा पंतप्रधान मोदींसाठी आजचा माफी मागण्याचा दिवस असल्याचा टोला लगावला. मागील ९ वर्षात काय केले, विचारले तर ९०० वर्षांपूर्वी काय झाले ते सांगितले जाते. नऊ वर्षात पेट्रोल ६० रुपयांवर १०० रुपयांवर आणि सिलिंडर ४०० रुपयांवर हजार रुपयांवर गेल्याचा टोला खेडा यांनी लगावला.
यासोबतच, नऊ वर्षांत बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचाराचे तांडव सुरू असल्याची तोफ सुप्रिया श्रीनेत यांनी डागली. अर्थव्यवस्थेचा ८ टक्क्यांवर असलेला विकासदर कोरोना आधीच निम्म्यावर येऊन पोहोचला होता. २३ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली पोचले. त्यामुळे सरकारने नऊ वर्षांच्या अपयशाचा महोत्सव साजरा करावा, असा उपरोधिक सल्ला काँग्रेस नेत्यांनी दिला.
दरम्यान, कर्नाटकचा जनादेश हा अन्य राज्यांमध्ये देखील भाजपला धडा शिकवणारा असेल, असा इशारा जयराम रमेश यांनी दिला. ते म्हणाले, की ९ वर्षात मोदी सरकारने यूपीए काळातील योजनांची नावे बदलली. स्वतःचेच मार्केटिंग केले .
घटनात्मक पदाचे अवमूल्यन : रमेश
‘‘ पंतप्रधान मोदी जिथे बोलायचे तिथे बोलत नाही आणि नको त्या वेळी बोलतात. सीमेवर घुसखोरीच्या प्रश्नात चीनला क्लीन चीट देऊन वाटाघाटींमध्ये मध्ये भारताची भूमिका दुबळी केली. याचा गंभीर परिणाम आपल्या मुत्सद्देगिरीवर झाला आहे. नऊ वर्षात संघराज्य व्यवस्थेवर हल्ला करण्यात आला. लोकनियुक्त सरकारे पाडण्यात आली. सर्व संस्थांचे, घटनात्मक पदांचे अवमूल्यन मागील ९ वर्षात पद्धतशीरपणे अवमूल्यन झाले ’’, अशी आरोपांची फैर जयराम रमेश यांनी झाडली.
काँग्रेसचे नऊ प्रश्न
(१) देशात महागाई आणि बेरोजगारी का वाढत आहे? सार्वजनिक मालमत्ता आपण मित्रांना का विकत आहात?
(२) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाही? शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा का झाला नाही?
(३) अदानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी एलआयसी आणि एसबीआयमध्ये जमा असलेला सर्वसामान्यांच्या पैशाला हात का लावला? अदानी यांच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? पीएम उत्तर का देत नाहीत.
(४) चीनला अद्दल शिकवू असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी चीनला क्लीन चीट का दिली? ते (चीन) तर आपल्या जमिनीवर ठाण मांडून बसले आहेत?
(५) निवडणुकीच्या फायद्यासाठी फूट पाडण्याच्या राजकारणाचा उपयोग केला जात आहे आणि समाजात भितीचे वातावरण तयार केले जात आहे, याबद्दल पंतप्रधानांनी सांगावे
(६) महिला, दलित, अल्पसंख्याकाच्या अत्याचारावर पीएम का बोलत नाहीत? जातीनिहाय जनगणनेच्या मागणीवर पीएम मौन का बाळगून आहेत?
(७) घटनात्मक आणि लोकशाही संस्थांचे अधिकार का कमी केली जात आहे? विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सरकारांना का टार्गेट केले जात आहे?
(८) ‘मनरेगा’ सारख्या योजना डबघाईला का आणल्या जात आहेत?
(९) कोरोनाच्या गैरव्यवस्थापनामुळे ४० लाख लोकांचे जीव गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय का मिळाला नाही?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.