गलवानमध्ये प्राणहानी झाल्याची जाहीर कबुली चीनने दिली

India-and-China
India-and-China

नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान सैन्य माघारीबाबत सहमती झाल्यानंतर सीमेवरील तणाव निवळू लागला आहे. मागील वर्षी गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीमध्ये प्राणहानी झाल्याची जाहीर कबुली चीनने आज दिली. या चकमकीत आपले चार सैनिक ठार झाल्याचे चीनने स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्यंतरी आंतरराष्ट्रीय माध्यमांत गलवानमधील संघर्षात ४५ चिनी सैनिक ठार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनने त्याचा इन्कार केला होता. दरम्यान, पॅन्गाँग सरोवरानंतर आता गोगरा, हॉटस्प्रिंग आणि देप्सांग या भागांतून सैन्य माघारीबाबत उद्या (ता. २०) भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये वाटाघाटी होतील. 

मागील वर्षी १६ जूनला लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीतील प्राणहानीचा तपशील चीनने आतापर्यंत सातत्याने दडविला होता.  या साऱ्या पार्श्वभूमीवर चीनने आज पहिल्यांदा जाहीरपणे कबुली देताना आमच्या लष्करानेच संयम बाळगल्याचा कांगावा केला. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार गलवान खोऱ्यातील घटनेनंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी चीनने प्रचंड संयम बाळगला.

दोन्ही सैन्यांमधील वाटाघाटी सुरू असल्याने प्राणहानीचा तपशील जाहीर करण्याचे टाळले. चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते आणि लष्कराचे वरिष्ठ कर्नल रेन गुओकियांग यांनीही अशाच आशयाचे वक्तव्य केले आहे. तणाव वाढू नये यासाठी चीनने प्राणहानीची माहिती जाहीर केली नव्हती. आता तणाव निवळल्यानंतर तपशील जाहीर केला जात असून चीनची ही कृती बुद्धिमान आणि दयाळू सिंहासारखी असल्याची दर्पोक्ती त्यांनी केली. तसेच भारतावर करार भंगाचा आरोप करण्यात आला.  गलवान खोऱ्यात ठार झालेल्या चिनी सैनिकांमध्ये कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com