श्रीनगर : फुटीरतावादी नेते आणि हुरियत कॉन्फरन्सचे संस्थापक सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर काश्मीर खोऱ्यातील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून लोकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.
गिलानी यांचे बुधवारी रात्री निधन झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपर्क साधनांवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात मोबाईलवरील संभाषण आणि इंटरनेटचा वापर यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संचारबंदी तसेच एकत्र जमण्यासही मनाई आहे.
दिलबाग यांनी बारामुल्ला येथे पत्रकारांशी संवाद साधला. लवकरच एका बैठकीत निर्बंधांचा आढावा घेऊन ते शिथिल केले जातील. गेल्या दोन दिवसांत एकही अनुचित घटना घडलेली नाही.
लोकांच्या सहकार्याने सुरक्षा दले अत्यंत संयमाने काम करीत आहेत. सगळीकडे शांतता ठेवल्याबद्दल मी लोकांचे अभिनंदन करतो. अफगाणिस्तानमधील स्थितीचा काश्मीरमध्ये परिणाम होईल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, काळजीचे कोणतेही कारण नाही.
"काश्मीर खोऱ्यातील काही युवक तालिबानमध्ये भरती झाल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानचे हस्तक असा अपप्रचार करतात. येथील युवक क्रिकेट, व्हॉलिबॉल, रग्बी खेळत आहेत. तुम्ही त्याची छायाचित्रे पाहात नाही का? येथील प्रत्येक मुलाला आपले भविष्य सुरक्षित करायचे आहे. कुणीही भरकटू इच्छित नाही."
- दिलबाग सिंह, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.