नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा गरीब भारतीय महिलांना बसला असून त्यांना नोकरी तर गमवावी लागलीच पण त्याचबरोबर त्यांचे जेवण देखील तुलनेने घटल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॅल्बर्ग कन्सल्टिंग फर्मने केलेल्या संशोधनातून पुढे आला आहे. कोरोना संसर्गाची पहिली लाट संपुष्टात आली असताना या महिलांना पुन्हा नव्याने रोजगार मिळणे अवघड झाले आहे. मागील वर्षी मार्च ते ऑक्टोबर या काळात या अनुषंगाने पाहणी करण्यात आली होती. देशातील दहा राज्यांतील कमी उत्पन्न गटातील पंधरा हजार महिला आणि २ हजार ३०० पुरुषांची मते जाणून घेण्यात आली होती. भटक्या जमाती आणि मुस्लिम समाजातील महिलांना याचा जबरदस्त तडाखा बसला असून विभक्त आणि घटस्फोटित महिलांनाही याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे उघड झाले आहे. कामाच्या आघाडीवर पुरुषांवर मात्र फारसा ताण आलेला दिसत नाही. कोरोना काळामध्ये महिलांचे आरोग्य आणि रोजगारावर नेमका काय परिणाम झाला? याचा वेध घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.
आहारात घट - १० %
महिलांना मासिक पाळीचे पॅडही नाही - १६ %
गर्भनिरोधक साधने मिळाली नाहीत - ३३%
महिलांना रोजगाराची प्रतिक्षा - ४३ %
महिलांवर कामाचा भार वाढला - ४७ %
महिलांनी कोरोनाकाळात कमी विश्रांती घेतली - २७ %
आम्ही तळागाळातील लोकांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पहिल्या लाटेमुळे निर्माण झालेल्या समस्यांची अनेक अंगांनी पाहणी करण्यात आली. या संसर्गाने आणखी काही महिलांच्या हातची रोजीरोटी काढून घेतली तर समाजाला मोठी किंमत मोजावी लागू शकते, यामुळे अनेक कुटुंबे कर्ज, गरिबीच्या खाईत लोटल्या जातील.
-श्वेता तोतापल्ली, डॅल्बर्गच्या सल्लागार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.