दिलासादायक बातमी : भारतात अजूनही तिसरा टप्पा नाही? सरकारचे स्पष्टीकरण

Corona-Danger
Corona-Danger

नवी  दिल्ली - भारतात कोरोनाचा फैलाव ‘सामाजिक संक्रमणा’च्या पातळीवर झालेला नाही. केवळ व्यक्तींमध्येच संक्रमण आहे, असे केंद्र सरकारतर्फे आज स्पष्ट करण्यात आले. कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी वाढणार नाही, असा खुलासाही करण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेला २१ दिवसांचा लॉकडाउन तीन महिन्यांपर्यंत वाढू शकतो, अशी अटकळबाजी सोशल मीडिया तसेच काही प्रसारमाध्यमांमध्ये असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज हे स्पष्टीकरण दिले आहे. भारतात सोशल डिस्टन्सिंग, लोकांचे सहकार्य आणि लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या कमी असल्याचाही दावा सरकारने आज केला. भारत ‘व्यक्तीकडून समूहाकडे’ या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात गेल्याचीही अफवा पसरत आहे. हे चुकीचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले.  

आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, की रुग्णांची मर्यादित संख्या पाहता लॉकडाउनचा परिणाम आणि सरकारची दिशा योग्य असल्याचे दिसते. भारतात बारा दिवसात बाधितांची संख्या १०० वरून १०८५ वर गेली. इतर देशांमध्ये प्रामुख्याने विकसित देशांमध्ये या कालावधीत रुग्णांची संख्या साडेतीन हजारांपासून ते नऊ हजारापर्यंत पोहोचली आहे. 

देशात ११५ सरकारी आणि ४७ खासगी प्रयोगशाळा आहेत. खासगी प्रयोगशाळांमध्ये १३३४ लोकांची चाचणी झाली. सरासरी ४२५ चाचण्या प्रतिदिन होत असल्याचे ‘आयसीएमआर’चे शास्त्रज्ञ डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले.

दहा विशेषाधिकार समूह
उपाययोजना आणि मार्गदर्शनासाठी १० सचिव स्तरीय अधिकाऱ्यांचे १० विशेषाधिकार समूह तयार करण्यात आले आहेत. तर कौशल्य विकास मंत्रालयाने नॅशनल स्किल इन्स्टिट्यूट आणि वसतीगृहांमध्ये विलगीकरण कक्ष बनविले आहेत.

पीपीई किटची संख्या वाढविणार
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, की कोरोनापासून संरक्षण करणारी वैयक्तिक संरक्षक उपकरणे म्हणजे `पीपीई किट`ची संख्या वाढवण्यात येत आहे.  विविध रुग्णालयांमध्ये सध्या ३, ३४, ००१ पीपीई किट उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांकडे २१ लाखांची पीपीई किटची मागणी नोंदवण्यात आली आहे. किटचा तुटवडा असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते .

बीएसएनएलची अबाधित सेवा
दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, २० एप्रिलपर्यंत बीएसएनएलचा प्रीपेड ग्राहकांची सेवा अबाधित ठेवण्यात येणार आहे. 

प्रवेशअर्जांना मुदतवाढ
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज केंद्रीय विद्यापीठे, यूजीसी, जेईई सारख्या परीक्षांसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एका महिन्याने वाढविली आहे.

निजामुद्दीनला ३०० संशयित
निजामुद्दीन परिसरात ३०० संशयितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. दिल्लीत तबलिगी जमातीच्या एका कार्यक्रमात एक हजार लोक सामील झाले होते आणि या अनुषंगाने सरकारने आता हुडकून काढून विलगीकरण कक्षांमध्ये पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com