नवी दिल्ली : कट्टर हिंदुत्व अशी कुणाची विचारसरणी नसते. मुळात भारतात धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच विकृत केली गेली आहे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी केलं आहे. माधव यांनी 'हिंदुत्व प्रतिमान' नावाचं पुस्तक लिहिलं असून यातून आपल्याला हिंदुत्वाबाबतचे अनेक गैरसमज दूर करायचे आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.
माधव म्हणाले, "हिंदुत्व ही भारताची मुलभूत विचारसरणी आहे. याबाबत भारतात विविध गैरसमज आहेत. हेच मला माझ्या 'हिंदुत्व प्रतिमान' या पुस्तकातून दूर करायचे आहेत. हिंदुत्व आणि दीनदयाल उपाध्याय यांचे अविभाज्य मानवतावादी तत्वज्ञान याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. या गोष्टींना मी माझ्या पुस्तकातून स्पर्श करणार आहे. आपल्या देशात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करणं गरजेचं आहे."
देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटतं हिंदुत्व हे अपारदर्शक, संकुचित विचारसरणी आणि मुस्लिमविरोधी आहे. पण ते चुकीचं असून 'कट्टर हिंदुत्व' अशी कोणाची वागणूक नसते. उलट भारतात धर्मनिरपेक्षतेची व्यख्याच विकृत केली गेली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड राजकीय विचारसरणीवर आधारित आहे विशिष्ट संप्रदाय वगळण्यावर नाही, असंही माधव यांनी म्हटलं.
दरम्यान ते पुढे म्हणाले, जगात धर्मनिरपेक्षतेचे विविध अर्थ अस्तित्वात आहेत. फ्रेन्च धर्मनिरपेक्षतेला धर्म पूर्णपणे अमान्य आहे. तर अमेरिकन धर्मनिरपेक्षतेत सर्व धर्मांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता सर्व धर्मांना सारखाच सन्मान देते, पण देशात अनेक दशकांपासून धर्मनिरपेक्षतेची विकृत व्याख्या करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.