'काँग्रेसमध्ये एकही पात्र उमेदवार न मिळाल्यास मी स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार आहे.'
भोपाळ : काँग्रेस सरकारमध्ये (Congress Government) दिग्विजय सिंह मुख्यमंत्री असते तर कदाचित सरकार गेलं नसतं, असं वक्तव्य मध्य प्रदेशचे महसूल आणि वाहतूक मंत्री गोविंद सिंह राजपूत (Govind Singh Rajput) यांनी केलंय.
दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्या कार्यशैलीत खूप फरक आहे. कमलनाथ यांच्या स्वभावामुळंच काँग्रेसचं मोठं नुकसान झालंय, असंही ते म्हणाले. शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) सागर जिल्ह्यातील खुराई इथं आले होते. इथं त्यांनी मध्य प्रदेशचे शहरी प्रशासन मंत्री भूपेंद्र सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. 'मी भूपेंद्र सिंह यांना सज्जन मानत होतो, पण इथलं चित्र खूप वेगळं आहे.'
मी भूपेंद्र सिंह (Bhupendra Singh) यांच्याविरोधात कट रचला असता तर भूपेंद्र हे भूपेंद्र राहिले नसते, असंही दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय. भूपेंद्र सिंह काँग्रेस कार्यकर्त्यांवर अत्याचार करत आहेत. मात्र, आम्ही ते सहन करणार नाही. भूपेंद्र यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये एकही पात्र उमेदवार न मिळाल्यास मी स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असंही दिग्विजय सिंह यांनी जाहीर केलं.
यानंतर काही वेळातच महसूल आणि परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दिग्विजय सिंह मुख्यमंत्री असते तर कदाचित काँग्रेसचं सरकार गेलं नसतं. राजपूतांनी दिग्विजय सिंह यांना वेळेनुसार नतमस्तक होणारं झाड म्हटलंय आणि कमलनाथ यांना वटवृक्ष म्हटलंय. याशिवाय, त्यांनी दिग्विजय सिंह यांचं तळागाळातील नेते म्हणूनही वर्णन केलंय. दरम्यान, भाजप मंत्र्यानं दिग्विजय सिंह यांचं कौतुक केल्यामुळं राजकीय तर्कविर्तक लढवले जात आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.