कोलकता ः केंद्रात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून तृणमूल काँग्रेस व भाजपमधील संघर्ष सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या संघर्षाला आणखी धार चढली आहे. प.बंगालमध्ये भाजपच्या प्रत्येक पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक पोस्टरवर तृणमूलच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र झळकत आहे.
त्याचप्रमाणे, दोन्ही पक्ष वृत्तपत्रांतही पहिल्या पानांवर जाहिरात करत आहेत. भाजपकडून ‘मोदी गॅरंटी’ अशी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रांत प्रकाशित होत आहे तर तृणमूल काँग्रेसही आपल्या सरकारच्या कामगिरी जाहिरातींद्वारे मांडत आहे. मात्र, निवडणुकीतील यशासाठी या दोन्ही पक्षांची मदार आश्वासनांपेक्षा आपापल्या दिग्गज नेत्यांवर अवलंबून आहे. संदेशखालीतील बहुचर्चित महिला अत्याचार व भ्रष्टाचारावरुन भाजप तृणमूलला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत महिला असुरक्षित असल्याचा आरोप भाजप करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या तपासाच्या मुद्द्यावरही भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. राज्यात सत्ता मिळाल्यास महिलांच्या सुरक्षिततेचे आश्वासन भाजप देत आहे.
भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी तृणमूल लक्ष्मी भांडार, कन्याश्री आदी कल्याणकारी योजनांवर भर देत आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेची (एनआरसी) अंमलबजावणी न करण्याचे आश्वासनही तृणमूल काँग्रेस मतदारांना देत आहे. भाजपची ‘व्होटबॅंक’ असलेल्या मातुआ समुदायात सीएए व एनआरसीमुळे भीती असून त्याचा फायदा उठविण्याचा तृणमूलचा प्रयत्न आहे. मातुआंना नागरिकत्वाचा अधिकार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात भाजप खासदार शंतनू ठाकूर यांना अपयश आल्याने भाजपच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. मातुआंना पूर्वीपासूनच मतांचा अधिकार असल्याचे सांगत आपला पक्ष मातुआंना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करेल, अशी तृणमूलची भूमिका आहे. भाजपने प. बंगालच्या १०० दिवस काम योजनेची हक्काची थकबाकी रोखल्याचा दावा करत तृणमूलने प्रचाराची राळ उडविली आहे. मोदी वेगाने नागरिकांचे संविधानिक स्वातंत्र्य हिरावून घेणारे हुकूमशहा बनत आहेत. पत्रकारही याला अपवाद नसून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीची त्यामुळे आठवण होते, असा युक्तिवाद केला जात आहे.
भाजप काँग्रेसप्रमाणेच तृणमूलमधील घराणेशाहीकडेही बोट दाखवीत आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसचा सरचिटणीस असलेला भाचा अभिषेक बॅनर्जी यांचा उल्लेख भाजप करत आहे. त्याचवेळी प. बंगालमधील कूचबिहारला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या आश्वासनासह इतर आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश आल्याबद्दल भाजपला तृणमूलकडून लक्ष्य केले जात आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री निशित प्रामाणिक यांच्याविरुद्धचे गुन्हे व त्यांची आपल्या मतदारसंघातील दीर्घकाळ अनुपस्थितीवरही तृणमूल अधोरेखित करत आहे.
तृणमूलचे मुद्दे
पंतप्रधान मोदींना हुकूमशहा बनण्यापासून रोखणार
सीएए, एनआरसीची अंमलबजावणी करणार नाही
रुग्णालयांत विनामूल्य उपचारांसाठी स्वास्थ्य साथी कार्ड
दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारकांना विनामूल्य धान्य व सिलिंडर
भाजपचे मुद्दे
प.बंगालमधील महिला असुरक्षितता, भ्रष्टाचार
तृणमूल काँग्रेस पक्षामधील घराणेशाही
‘मोदी गॅरंटी’द्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.