नवी दिल्ली - शेजारील सर्व मित्रदेशांबरोबरील दळणवळण अधिक सुविधाजनक करण्यासाठी त्याद्वारे व्यापार वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी आज भारत-नेपाळ सीमेवरील जोगबनी-बिरतनगर या दुसऱ्या सर्वसमावेशक तपास नाक्याचे उद्घाटन केले.
हा तपास नाका भारताच्या साह्याने बांधण्यात आला आहे. मोदी आणि ओली यांनी अनुक्रमे नवी दिल्ली आणि काठमांडूमधून व्हिडिओ लिंकद्वारे या तपास नाक्याचे उद्घाटन केले. या तपास नाक्यामुळे भारत आणि नेपाळमधील व्यापार वाढण्याबरोबरच जनतेचा संवादही वाढीला लागेल, असा विश्वास दोन्ही बाजूंकडून व्यक्त झाला आहे. भारत-नेपाळ सीमेवर पहिला सर्वसमावेश तपास नाका रक्सौल-वीरगंज येथे २०१८ मध्ये उभारण्यात आला आहे.
उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले,‘‘मित्रदेशांबरोबरील वाहतूक अधिक सोईस्कर आणि सुविधाजनक करण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न असतो. या देशांबरोबर व्यापार, संस्कृती आणि शिक्षणातही आदान-प्रदान वाढविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. भारत आणि नेपाळ सीमेवर रस्ते, रेल्वे आणि इतर विविध मार्गांनी दळणवळण वाढविण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.’’ नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये ५० हजार घरे बांधून देण्याचे आश्वासन नेपाळला दिले होते. यापैकी ४५ हजार घरे बांधून झाली असल्याचे मोदी यांनी सांगितले. ओली यांनी मोदी यांना आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.