नवी दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड यश मिळाले आहे. या यात्रेला विरोधी पक्ष घाबरल्याने त्यांनी त्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखविला आणि विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले.
केंद्रात नव्याने मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या राज्यात जाऊन जनआशीर्वाद यात्रा काढण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार देशात ३९ मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढल्या. त्याचा समारोप नुकत्याच झाला. त्या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. परंतु या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली. या कारवाईवरही जे.पी. नड्डा यांनी टीका केली.
नड्डा म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी महाराष्ट्र सरकारने गैरवर्तन केले, जनतेला लक्ष्य बनविण्यात आले. हा सर्व प्रकार आपण सर्वांनी पाहिला आहे. लोकशाहीवरील हा हल्ला होता. परंतु जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. जनतेने विरोधी पक्षांच्या मनसुब्यांना नाकारत विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. याबद्दल पक्ष त्यांचा ऋणी आहे.’’
"नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व योजना या सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. सरकारची प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी देशातील प्रत्येक गाव, गरीब, शेतकरी, दलित, शोषित, मागास आणि महिला आहेत. देशाचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षा हेच आमचे उद्दिष्ट आहे."
- जे. पी. नड्डा ,राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.