नवी दिल्ली : भारत-चीन सीमाभागात भारतीय हद्दीतील 44 नव्या पुलांच्या कामाचं उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते नुकतचं करण्यात आलंय. त्यामुळं चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. चीनकडून यावर खोडसाळ प्रतिक्रिया देण्यात आलीय. भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यावर चीननं आक्षेप घेतलाय.
लडाख, अरुणाचल प्रदेशला विरोध
चीननं म्हटलंय की, लडाखला केंद्र शासित प्रदेश जाहीर करण्याला आम्ही मान्यता देत नाही. मुळात भारताने बेकायदेशीरपणे लडाखला केंद्रशासित प्रदेश जाहीर केले आहे. या परिसरातील पायभूत सुविधांच्या उभारणीला आम्ही विरोध करत आहोत. सीमेवरील पायाभूत सुविधांची उभारणी हाच मुद्दा दोन्ही देशां दरम्यानच्या तणावाला कारणीभूत आहे, असं मत चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजियान यांनी मांडलं आहे. सीमेवर सातत्याने चीन कुरघोड्या करत असल्याने भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलीय. चीनने सीमेवर त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीला सुरुवात केलीय. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेश येथे सीमा परिसरात पायभूत सुविधांची कामे वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर चीनकडून तातडीने प्रतिक्रिया देण्यात आलीय.
चीनचा वायफळ दावा!
चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, पहिल्यांदा आम्ही हे स्पष्ट करतो की, चीन लडाखला केंद्र शासित प्रदेश मानण्यास तयार नाही. आम्ही त्याला मान्यता देत नाही. लडाख आणि अरुणाचल प्रदेशला भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केले आहे. सैन्यासाठी सीमेवर पायभूत सुविधा उभारणीला आमचा विरोध आहे. सहमतीशिवाय सीमेवर कोणत्याही बाजूने अशी पावले उचली जाऊ नयेत. यामुळे सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खो बसत आहे. भारत पायाभूत सुविधांबरोबरच भारत सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करत आहे. त्यामुळेच दोन्ही देशांदरम्यान, तणाव वाढत आहे, असा वायफळ दावा चीनने केलाय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.