‘लॅन्सेट’चा अहवाल : प्रदूषण भारतीयांच्या मुळावर; २०१९ मध्ये २३.५ लाख मृत्यू
नवी दिल्ली : जगभरात प्रदूषणाचे प्राणघातक परिणाम समोर येत आहेत. भारतात २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे २३.५ लाख जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा दावा ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी’ या नियतकालिकात करण्यात आला आहे. यात हवा प्रदूषणामुळे १६.७ लाख मृत्यू झाले आहेत. त्यातही हवेतील २.५पीएम किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या प्रदूषित कणांमुळे मृत्यू झालेल्या ९.८ लाख जणांचा समावेश आहे. तर घरातील हवा प्रदूषणामुळे ६.१ लाख जणांचा मृत्यू झाला. जगभरात २०१९ मध्ये प्रदूषणाने ९० लाख जणांना जीव गमवावा लागला. भारतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
जगभरात सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे झाला असून हवा प्रदूषणामुळे सर्वाधिक ६६ लाख जणांनी प्राण गमावले. त्याचप्रमाणे, जलप्रदूषणामुळे १३ लाख तर शिसे नऊ लाख जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. २०१९ मध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्युंमुळे ४६ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. ते आर्थिक उत्पादनाच्या ६.२ टक्के आहे. याबद्दल जिनिव्हातील ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अँड पोल्यूशन संशोधक रिचर्ड फुलेर म्हणाले, की उत्तर भारतात हवा प्रदूषणाची तीव्रता सर्वाधिक आहे. भौगोलिक रचना व ऊर्जा, उद्योग, कृषी व इतर उपक्रमांमुळे प्रदूषण होते. भारतात घरामधील जीवाश्म इंधनाचे ज्वलन हे हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे. त्यानंतर, कोळशाचे ज्वलन व पिके जाळण्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा क्रमांक लागतो. भारतात हवा प्रदूषण २०१४ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील उच्चांकी ९५ मिलिग्रॅम प्रतिघनमीटरवरून ८२ मिलिग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत कमी झाले, परंतु यात पुन्हा वाढ होत आहे, असे संशोधकांनी सांगितले.
केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा नाही
भारताने हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम असून २०१९ मध्ये राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगही स्थापन करण्यात आला. त्याचप्रमाणे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रदूषण स्त्रोतांवर उत्सर्जन मानके लागू करण्याचे नियामक अधिकार आहेत. मात्र, हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भारतात सशक्त केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा नसल्याकडेही अहवालात लक्ष वेधले आहे.
आरोग्यासह सामाजिक, आर्थिक परिणाम होत असूनही आंतरराष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यावर हवा प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. २०१५ पासून हवा प्रदूषणाच्या आरोग्यावरील परिणामांचे दस्ताऐवजीकरण होऊनही निधीत नाममात्र वाढ करण्यात आली.
- रिचर्ड फुलेर, संशोधक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.