पाटणा : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी भाजप आणि एनडीएची साथ सोडली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलासोबत नवं सरकार स्थापन करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. यासाठी राजदच्या नेत्या राबडी देवी यांच्यासह त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची त्यांनी भेट घेतली. तसेच झालं गेलं विसरुन जा आणि नव्या अध्यायासाठी तयार रहा, अशा शब्दांत नितीश कुमार यांनी त्यांना साद घातली.
"आता सन २०१७ मध्ये काय झालं ते विसरुन जा आपण आता नवा अध्याय सुरु करुयात," अशा शब्दांत नितीश कुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांना साद घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती राजदच्या सुत्रांकडून मिळते. याला तेजस्वी यादव यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून ते राजभवनाकडे रवाना झाले आहेत.
बिहारमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगात वेगाने घडामोडी घडत असून नितीश कुमार हे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. राजभवनावर नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट होऊन ते सत्तास्थापनेचा दावा करु शकतात.
दरम्यान, आपल्या आमदार आणि खासदारांशी चर्चा केल्यानंतर एनडीएतून बाहेर पडण्यावर सर्वांचं एकमत झाल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळं जेडीयू अधिकृतरित्या भाजप आणि एनडीएतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.