नुकसान एक लाखाचे आणि पीकविम्यातून भरपाई मात्र एका रुपयाची

नुकसान एक लाखाचे आणि पीकविम्यातून भरपाई मात्र एका रुपयाची

मध्य प्रदेश : शेतकऱ्यांना सातत्याने नवनव्या संकटांना सामोरे जावे लागते. कधी पावसाच्या अवकृपेमुळे दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान. सातत्याने निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला अशा संकटांचा सामना हा करावाच लागतो. झालेल्या नुकसानाची भरपाई व्हावी म्हणून अनेक सरकारी योजनांचा रतिब शेतकऱ्यांसाठी म्हणून लावला जातो. पण जर या योजनाच शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि झालेल्या नुकसानीचं हसं करणाऱ्या असतील तर...? मध्यप्रदेशात नुकसान झालेल्या शेतकऱ्याला त्याची भरपाई म्हणून निव्वळ एक रूपया सरकारकडून देण्यात आला आहे. 

ही घटना आहे मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील. पीक विमा योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या नुकसानभरपाईमधून या शेतकऱ्याला ही रक्कम मिळाली आहे. सरकारने नुकसान झालेल्या २२ लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत भरपाई दिल्याचा दावा केला आहे. मात्र झालेले नुकसान आणि दिलेली भरपाई यात अत्यंत तफावत आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

पुरणलाल या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीबद्दल फक्त एक रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. या शेतकऱ्याच्या अडीच एकरवरील पिकाचे नुकसान झाले होते. जवळपास एक लाखाहून अधिक रुपयांचे हे नुकसान होते. पीकविम्याअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव आल्याने या शेतकऱ्यालाही मदत मिळणार होती. मात्र उद्ध्वस्त झालेल्या पीकाची रक्कम म्हणून निव्वळ एक रूपया रक्कम पीकविम्यातून त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 

निव्वळ या एकाच शेतकऱ्याला असा अनुभव आला नाहीये. तर याच जिल्ह्यातील आणखी दोन शेतकऱ्यांना 70 रुपये आणि 92 रुपये अशी अत्यंत किरकोळ रक्कम या योजनेअंतर्गत खात्यात जमा केली आहे. 

यासंदर्भात कृषी विभागाकडे चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी ठोस अशी काही माहिती देण्यास नकार दिला. मात्र एका अधिकाऱ्याने ओळख न सांगण्याच्या अटीवर अशी माहिती दिली की, ज्या शेतकऱ्यांना 200 रुपयांहून कमी रक्कम मिळाली आहे, त्यांची परत चौकशी केली जाणार आहे. अशी सर्व प्रकरणे विमा कंपनीकडे परत तपासणीसाठी जाणार आहेत. या एकूण प्रकरणी कृषी विभाग या विमा कंपन्यांशी चर्चा करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 

बैतुल या जिल्ह्यात 64 हजार 893 शेतकरी नुकसानग्रस्त झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 81 कोटी 71 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र यातील काही शेतकऱ्यांच्या वाट्याला अगदीच कमी रक्कम ही राज्य सरकारने जमा केली आहे. अशा शेतकऱ्यांनी हा विषय सरकारसमोर मांडण्याचा विचार सुरु केला आहे. आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना याप्रकारे किरकोळ रक्कम जमा करुन सरकार शेतकऱ्यांची थट्टा उडवत आहे का, असा संतप्त सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com