"पवारांना अडकवण्याचा ममतांचा डाव, काँग्रेसविरोधात रचतायत कट"

ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेसवर सडकून टीका केली होती.
mamata Banerjee
mamata Banerjee

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी शरद पवारांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच काँग्रेसविरोधात कट रचत आहेत, असा खळबजनक आरोप काँग्रेसचे काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांनी केला आहे. ममता सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली त्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेतली. सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम पर्याय बनवण्यासाठी त्या विरोधी पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

चौधरी म्हणाले, "जेव्हा भाजप देशभरात संघर्ष करत होता तसेच या पक्षाची स्थिती दिवसागणिक वाईट बनत चालली होती. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी भाजपला ऑक्सिजन पुरवण्याचं काम केलं होतं. त्यामुळं भाजप त्यांच्यामुळं सुखावला होता. यूपीए म्हणजे काय हे ममता बॅनर्जींना माहीत नाही का? मला वाटतं त्यांनी आता मूर्खपणा करायला सुरुवात केली आहे. त्यांना वाटतंय की संपूर्ण देश आता ममता, ममता असा जयघोष करत आहे. पण भारत म्हणजे बंगाल नव्हे आणि एकटा बंगालमध्ये भारत नव्हे. पश्चिम बंगालमधील त्यांच्या रणनीतीतूनच त्यांचा हेतू हळूहळू उघड झाला आहे"

'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा' ही ममता बॅनर्जींची भूमिका असून आज भाजपला खूष ठेवण्याचा त्यांचा हेतू आहे. युपीएच्या सरकारमध्ये तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री होते. सन २०१२ मध्ये ममतांनी युपीएचा पाठींबा काढून घेण्यासाठी काहीतरी कारण सांगितलं. त्यावेळी युपीएचं सरकार पाडण्याचा त्यांचा डाव होता. पण यामध्ये त्यांना यश आलं नाही कारण त्यावेळी इतर पक्षांनी तातडीनं सरकारला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळं ममतांचं कट-कारस्थान रचण्याचं हे काम जुनचं आहे. आज त्यांची हिंमत वाढलीए कारण मोदी त्यांच्या मागे आहेत. त्यामुळं ते काँग्रेसला कमजोर करण्याचे हरऐक प्रयत्न करत आहेत.

मुंबईतल्या भेटीनंतर शरद पवार काँग्रेसविरोधात काहीही म्हणाले नाहीत, ते ज्येष्ठ नेते आहेत. आम्हाला त्यांच्याप्रती मोठा आदर आहे. शरद पवार आणि इतर पक्षांच्या लोकांना अडकवण्याचा आणि भाजपला आपणच पर्याय आल्याचे दाखवण्याचा ममता बॅनर्जींचा पूर्व नियोजित कट आहे. याचा सर्वाधिक फायदा भाजपला होत आहे, अशा शब्दांत अधिर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली.

पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ममतांनी युपीए आता राहिलेली नाही, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला होता. तर भाजपला पराभूत करण्यासाठी सक्षम पर्याय उभा करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच राहुल गांधी सारखे परदेशात असतात काँग्रेसला लढायचचं नाही तर आम्ही काय करु शकतो? अशा शब्दांत काँग्रेसवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com