शेतकरी आंदोलनामुळे तब्बल एवढ्या कोटींचा बसला फटका

Farmer-Agitation-Delhi
Farmer-Agitation-Delhi

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाची अर्थव्यवस्थेला झळ बसू लागल्याने  उद्योग क्षेत्र धास्तावले आहे. पंजाबसह हरियाना, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या परस्परावलंबी अर्थव्यवस्थेला आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने व्यक्त केला आहे. तर, उत्तर रेल्वेनेही दोन हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 

कृषी कायद्यांविरोधात आधी पंजाबमध्ये आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे मोर्चा वळविला असून सिंघू, टिक्री, गाझीपूर सीमेवर त्यांनी ठिय्या दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.  जयपूर महामार्गावरील वाहतूकही रोखण्याचा प्रयत्न झाला होता. उद्योग क्षेत्राला याचा फटका  बसला असून असोचेमच्या दाव्यांनुसार पंजाबच नव्हे तर हिमाचल प्रदेश, हरियाना तसेच जम्मू- काश्मीरवरही याचा परिणाम होतो आहे. वाहतूक ठप्प झाल्याने उद्योगांच्या पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊन ३५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहतुकीचा कालावधी वाढला
भारतीय उद्योगांचा महासंघ असलेल्या सीआयआयनेही (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज)  रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहतुकीसाठी ५० टक्के अधिक कालावधी लागत असून विस्कळित झालेल्या पुरवठा साखळीमुळे खर्चातही ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. आधीच कोरोना काळातील अडचणी असताना त्यात शेतकरी आंदोलनाची भर पडली असून दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील तपासणी नाक्यांदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्रतिष्ठेवरदेखील विपरीत परिणाम
या चारही राज्यांची एकत्रित अर्थव्यवस्था १८ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. मात्र शेतकरी आंदोलनामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, निर्यातीला हातभार लावणारे कपडे निर्मिती उद्योग, वाहनांचे सुटे भाग उत्पादन, सायकल, क्रीडा साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांमधील उलाढाल थांबली आहे. आंदोलनामुळे उत्पादकांना मागणीनुसार मालपुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता नाताळ सणाच्या काळात या उद्योगांच्या जागतिक बाजारपेठेतील प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याची चिंता असोचेमचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेचे २००० ते २४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आंदोलनामुळे रेल्वेची मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.
- आशुतोष गांगल, उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com