
Sharad Pawar : अदानी-पवारांची पुन्हा भेट का झाली? खुद्द शरद पवारांनीच केला खुलासा
Latest Marathi News: अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपती एक असलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील अदानींनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. याआधी अदानी आणि पवार एप्रील महिन्यात देखील भेटले होते.
राजकीय चर्चेदरम्यान शरद पवार यांनी अदानी यांच्यासोबतच्या भेटीवर मौन सोडत पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी अदानींसोबतची ही भेट टेक्निकल असल्याचे म्हटलं आहे.
शरद पवारांनी सांगितलं की, सिंगापूर येथील एक प्रतिनिधीमंडळ माझ्याकडे आलं होतं आणि त्यांना काही टेक्निकल मुद्द्यांवर उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती.
यादरम्यान गौतम अदानी आणि सिंगापूर प्रतिनिधीमंडळ यांच्यात ही बैठक झाली. मात्र हा टेक्निकल मुद्दा होता. त्यामुशे याबद्दल मला अधिक काही माहिती नाही.
गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही बैठक तब्बल अर्धा तास चालली होती. शरद पवारांनी या बैठकील टेक्निकल म्हणत विषय टाळला असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याआधी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात गौतम अदानी यांची बाजू घेतली होती.
प्रकरण काय आहे?
अमेरिकेतील फर्म हिंडनबर्गने मागील काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपबद्दल एक रिपोर्ट जारी केली आहे. हिंडनबर्गने त्यांच्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपवर मार्केटमध्ये हेरफेर आणि अकाउंटमध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
या रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मात्र गौतम अदानी यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
अदानी हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून सेबीने या प्रकरणात रिपोर्ट सादर केला होता.
अदानी यांच्याविरोधात विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशनात देखील यावरून खूप गदारोळ झाला होता. १९ विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणात जैपीसीची मागणी करत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र शरद पवारांनी या मुद्द्यावर वेगळा स्टँड घेतला होता.

पवार काय म्हणाले...
शरद पवारांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हिंडनबर्ग रिपोटबद्दल बोलताना सांगितले की, या व्यक्तीने यापूर्वी देखील वक्तव्य केले होते आणि त्यानंतर देखील सभागृहात गोंधळ झाला होता. मात्र यावेळी या मुद्द्याला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं गेलं आहे.
रिपोर्ट आली त्यामध्ये करण्यात आलेली वक्तव्य कोणी केली आहेत, त्याची पार्श्वभूमी काय आहे. ज्यामुळे देशात गोंधळ उडवून देणारे मुद्दे उपस्थित केले जातात तेव्हा याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो. हे पाहून वाटतं की हे सर्व कोणालातरी टार्गेट करण्यासाठी केला जात आहे.