Nehru Death anniversary : नवीन संसद भवनाचे बांधकाम होताच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सेंगोलची चर्चा सुरू झाली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 ला तामिळ पुजाऱ्यांच्या हस्ते सेंगोल स्वीकार केला होता. भारतीय सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून हा सेंगोल पाहिला गेला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
असे अनेक किस्से समोर आल्यानंतर सध्याचे राजकारण पुन्हा एकदा नेहरू केंद्रित झाल्याचं दिसतंय. केवळ सेंगोलच नाही, तर नेहरूंचा कार्यकाळ आणि सर्व राजकीय प्रश्न आणि आर्थिक धोरणांबाबतचे निर्णय केंद्रस्थानी ठेवण्यात आलेत.
भारतीय संसदेशी निगडीत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्याशी निगडित हा किस्सा खूपच मनोरंजक आहे.
हा किस्सा आहे 12 मे 1951 सालचा. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेची पहिली दुरुस्ती संसदेत मांडली. या दुरुस्तीने भाषण स्वातंत्र्य आणि मालमत्तेचा अधिकार यासह काही मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणल्या.
नेहरू आणि मुखर्जी यांच्यात शाब्दिक युद्ध
राज्यघटनेच्या पहिल्या दुरुस्ती विधेयकावरील चर्चा ही सर्वात महत्वाच्या चर्चेपैकी एक होती. वास्तविक या काळात जवाहरलाल नेहरू आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आमनेसामने होते, त्यांच्यात दीर्घकाळ शाब्दिक युद्ध झाले. यामुळे संसदेत उपस्थित सर्व सदस्य अवाक झाले.किंबहुना ही दुरुस्ती नववी अनुसूची तयार करण्याच्या उद्देशाने होती. या दुरुस्तीला अनेक तज्ञांनी 'संविधानिक तिजोरी' म्हटलं होतं, कारण या कायद्याला न्यायालयांमध्ये आव्हान देता येणार नव्हतं.
मग नेहरूंनी आपल्या भाषणात पहिली दुरुस्ती योग्य ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांना मंत्रिमंडळातून आणि काँग्रेसमधूनही तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्यावेळी नेहरू मोठ्या आवाजात म्हणाले होते, तुम्हाला, मला आणि देशाला सामाजिक आणि आर्थिक अडचणीतून चांगल्या दिवसाची वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी आपण जबाबदार आहोत. आपण जनतेला काय उत्तर देणार?
मुखर्जी यांनी ठामपणे नकार दिला
त्यानंतर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी सभागृहातील नेहरूंचे भाषण नाकारले. त्यांच्या या भाषणाला काँग्रेसच्या खासदारांनीही पाठिंबा दिला. ते म्हणाले होते की, "तुम्हीच कायदा करणार, तुम्हीच संविधान बनवणार, त्याचा अर्थ लावणार आणि त्याचे संपूर्ण काम पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातात राहणार, हे कसं शक्य आहे. खरं तर तुम्ही संविधानाकडे फक्त कागदाचा तुकडा म्हणून बघत आहात."
अखेर हे विधेयक काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या निवड समितीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर त्याचा नवा मसुदा कायदा करण्यासाठी संसदेत मांडण्यात आला, त्यामुळे 31 मे 1951 रोजी नेहरू आणि मुखर्जी यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध झाले.
नेहरूंची तुलना डेन्मार्कच्या राजपुत्राशी करण्यात आली
विधेयकावर पुन्हा मतदान होण्यापूर्वी मुखर्जी यांनी बोलण्यास सुरुवात केली. शेक्सपियरच्या हॅम्लेटमधील काल्पनिक संकटांशी लढणाऱ्या डेन्मार्कच्या राजपुत्राशी तुलना त्यांनी नेहरूंशी केली आणि ते म्हणाले, "भूतांशी लढण्यासाठी तुम्ही संविधान पारित करू शकत नाही किंवा त्यात सुधारणा करू शकत नाही."
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.