लशीसाठी हवी ऑनलाइन नोंदणी

Corona Vaccine
Corona Vaccine

नवी दिल्ली - देशभर येत्या सोमवारपासून (ता.१) सुरू होणाऱ्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या अनुषंगाने आज केंद्राकडून नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. या टप्प्यामध्ये साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच गंभीर व्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येईल. मात्र या लसीकरणासाठी नागरिकांना ऑनलाइन नोंदणीसह काही अटींची तांत्रिक पूर्तता करावी लागणार आहे. देशातील अशा लोकांची संख्या २७ कोटी असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोरोना लसीकरणाचे दोन टप्पे सध्या सुरू आहेत. १ मार्चपासून पुढील लसीकरण सुरू होणार असल्याचे केंद्राने नुकतेच जाहीर केले होते. यासाठी नोंदणी प्रक्रिया करताना संबंधितांना आपण मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, पोटाचे तसेच किडनीचे विकार आदींपैकी एक किंवा अनेक आजार असल्याचे नोंदणीकृत डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. भारतीय वैद्यक कायद्यानुसार हे आजार गंभीर श्रेणीमध्ये  मोडतात. सरकारने या लसीकरणासाठी देशभरात  १० हजार केंद्रे  निश्‍चित केली आहेत. त्याशिवाय केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत करार केलेल्या १२ हजारांपैकी कोणत्याही खासगी रुग्णालयांत लसीकरण केले तर प्रत्येक लशीचे ४०० याप्रमाणे दोन डोसचे ८०० रुपये द्यावे लागतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या टप्प्यात १.३४ कोटी लसीकरण 
लसीकरण मोहिमेच्या १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात १ कोटी ३४ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात यात केवळ २००० खासगी केंद्रांचा सहभाग होता. मात्र आता देशातील १२ हजार खासगी रुग्णालये आयुष्मान भारतशी जोडली असून तेथेही लसीकरण सुविधा उपलब्ध होईल. 

अशी होईल नोंदणी 
- आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर किंवा को-विन ॲपवर नोंदणी करता येईल. 
- ज्यांना ऑनलाइन नोंदणी करणे जमले नाही त्यांच्यासाठी वॉक इन रजिस्ट्रेशनची सुविधा असेल. 
- आधार कार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, नोकरीचे ओळखपत्र, मनरेगा, आरोग्य विमा स्मार्टकार्ड, खासदार, आमदार यांनी दिलेली १२ प्रकारची अधिकृत ओळखपत्रे नोंदणीस वैध असतील. 
- तुमचे नाव लसीकरणासाठी निश्‍चित झाले असेल तर तुमच्या मोबाईलवर लसीकरणाची तारीख, ठिकाण व वेळेची माहिती देणारा मेसेज येईल.

केंद्राकडून नवे दिशा निर्देश
नवी दिल्ली - देशाच्या अनेक राज्यांत  कोरोना रूग्णसंख्या सातत्याने घटली असली तरी महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत ती वाढत असल्याने केंद्र सरकारने यापूर्वीचे आरोग्य दिशानिर्देश ३१ मार्चपर्यंत कायम राहतील, असे आज जाहीर केले. राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाचा वेग वाढवावा अशाही सूचना केंद्राने दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जे कोरोना दिशानिर्देश जारी केले आहेत ते यापूर्वीच्या निर्देशांप्रमाणेच  (२७ जानेवारी) आहेत. आता त्यांची कालमर्यादा वाढविण्यात आली आहे. यानुसार रूग्णसंख्या घटत असली तरी संबंधित राज्यांनी चाचण्या, देखरेख व कंटेन्मेंट विभागांबाबतच्या तरतुदी यापुढेही कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

कंटेन्मेंट विभागांत कोरोना आरोग्य नियमांचे व लॉकडाउनचे सक्तीने पालन करण्याबरोबरच अशा विभागांची संख्या प्रसंगी वाढविण्याचीही सूचना करण्यात आली आहे. नव्याने उद्रेक होणाऱ्या वा झालेल्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचीही सूचना केंद्राने केली आहे. जेथे कोरोना रूग्णसंख्या गेले काही दिवस आढळलेली नाही त्या भागांवरही, विशेषतः नागरिक आरोग्य नियमांचे पालन करतात का, याकडे बारकाईने लक्ष ठेवण्यास केंद्राने बजावले आहे.

परदेशातील विषाणू
ब्रिटन, दक्षिण अफ्रिका व ब्राझीलमधून भारतात आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत विशेष सावधगिरी बाळगण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे. देशातील १८ राज्यांत नव्या कोरोना विषाणूचे रूग्ण आढळले आहेत. विविध राज्यांतील किमान १८७ कोरोना रूग्णांच्या शरीरात ब्रिटनच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आळले आहे.

संसर्गाच्या आघाडीवर

  • मुंबईत तीन दिवसांत ३ हजार रुग्ण
  • नागपुरात शनिवार, रविवार मिनी लॉकडाउन
  • हिंगोलीत बाहेरून येणाऱ्यांच्या चाचण्या अनिवार्य
  • सोलापूरमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना बाधा
  • राज्यात निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com