Lockdown : ... यासाठी देशात मिलिटरी तैनात करा; सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल!

Supreme-court
Supreme-court

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. फक्त जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. 

कोरोनाची लागण होऊ नये, यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. तरीही अनेक नागरिक वारंवार घराबाहेर पडत आहेत. पोलिस प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे देशभरात सर्वत्र भारतीय सैन्य तैनात करण्यात यावे, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

याचिकेत म्हटले आहे की, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना धक्का पोहचू नये यासाठी नियमावली जाहीर करण्यात यावी. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांची सीबीआय आणि एनआयए या संस्थांद्वारे चौकशी करण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकार अजूनही कोरोनाला आळा घालू शकलेले नाही. त्यामुळे नियम आणखी कडक करण्यात यावेत.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने लोकांनी एकाठिकाणी मोठ्या संख्येत जमा होऊ नये, असे सांगितल्यानंतरही अनेक कामगार दिल्लीतील आनंद विहार भागात हजारोंच्या संख्येने जमा झाले होते. तसेच निजामुद्दीनमध्येही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आल्यानंतर अशा घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली. आणि ही संख्या आणखी वाढण्याचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. 

तसेच डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नर्स यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकारही घडत आहेत. ज्या लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, तेदेखील खुलेआम बाहेर फिरताना दिसत आहेत. देशभरात हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागात असे प्रकार घडल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यामुळे देशभरात सैन्य तैनात करणे किती महत्त्वाचे आहे, हे याचिकेत नमूद केले आहे. 

लॉकडाऊनचे नियम मोडून समाजात हिंसा पसरविण्याचे प्रकारही घडले आहेत. अशांविरोधात फक्त तक्रार दाखल करून काही होणार नाही. त्यामुळे काही दिवस भारतीय सैन्याकडे सुरक्षा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आल्यास यामध्ये नक्कीच फरक जाणवून येईल, असेही या याचिकेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com