पत्रकाराने विचारलेल्या 'अवघड' प्रश्नावर प्रकाश जावडेकर भडकले!

Prakash_Javdekar
Prakash_Javdekar

नवी दिल्ली- सुपरस्टार रजनीकांत यांना दादा साहेब फाळके पुरस्कार दिला जात असल्याची घोषणा केंद्रीय सूचना आणि प्रचारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. यादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते भडकल्याचं पाहायला मिळालं. रजनीकांत यांना दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यामागे राजकारण आहे का? कारण तमिळनाडूमध्ये निवडणुका होणार आहेत. यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारामागे राजकारणाचा गंध येतो, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. पत्रकाराच्या या प्रश्नावर जावडेकर चांगलेच भडकले. तुम्ही योग्य प्रश्न विचारायला हवा, असं प्रकाश जावडेकर तावातावात म्हणाले. पुढे बोलताना जावडेकरांनी रजनीकांत यांना देण्यात आलेल्या पुरस्काराबाबत  स्पष्टीकरण दिलं. 

५ लोकांच्या टीमने केली होती शिफारस 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, पुरस्कार चित्रपट जगताशी संबंधित आहे. पाच सदस्याच्या ज्यूरीने रजनीकांत यांच्या नावाची निवड केली आहे. त्यामुळे यामध्ये राजकारणाचा काय संबंध येतो. प्रश्न योग्य आणि विचार करुन विचारत जा. सुपरस्टार अभिनेते रजनीकांत जवळपास ५० वर्षांपासून चित्रपट जगतात आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी लोकांचे मनोरंजन केलंय. याचमुळे त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. 

राजकीय कारकीर्द सुरु करणार होते रजनीकांत

संपूर्ण भारतात रजनीकांत यांचे चाहते आहेत. काही चाहते अगदी जीव तोडून त्यांच्यावर प्रेम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजकारणात एन्ट्री मारण्याची घोषणा केली होती. ते भाजपसोबत युती करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. याच संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची भेट घेतली होती. पण, नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारणात न येण्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते आणि भाजपचा हिरमूस झाला होता.

तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशात भाजपने रजनीकांत यांना दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग तमिळनाडूमध्ये आहे. त्यांनी निवडणूक लढली असती, तर राज्यातील मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे जाण्याचे चित्र होते. पण, त्यांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयामुळे ही शक्यता मावळली आहे. अशात रजनीकांत यांना पुरस्कार दिल्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com