प्रियांका गांधींना धक्काबुक्की; उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप!

Priyanka-Gandhi
Priyanka-Gandhi

लखनऊ : नागरिकत्व कायद्यावरून देशात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. उत्तर प्रदेशात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. 

''उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी एका माजी पोलिस अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी जाताना पोलिसांनी मला अडवले. माझा गळा दाबला आणि मला ढकलून दिले,'' असा गंभीर आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी (ता.28) उत्तर प्रदेश पोलिसांवर केला आहे.  

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी असलेल्या एस. आर. दारापुरी यांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून निघाल्या होत्या. मात्र, लोहिया चौकात पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पायी चालत जात असताना पोलिसांनी मला घेरले, आणि एका महिला पोलिस कर्मचारीने माझा गळा दाबला. मला धक्का दिला त्यामुळे मी जमिनीवर पडले. त्यानंतर मी एका कार्यकर्त्याच्या टू-व्हिलरवरून जात असताना पुन्हा माझी अडवणूक करण्यात आली, अशी माहिती प्रियांका गांधी यांनी एएनआयशी बोलताना दिली. 

प्रियांका पुढे म्हणाल्या की, 77 वर्षांचे माजी पोलिस अधिकारी दारापुरी यांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने करावीत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट प्रदर्शित केली होती. त्यांची पत्नी आजारी असतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांशी अशा प्रकारचे वर्तन केले जात आहे. मात्र, या दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही. आमचा सत्याग्रह आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी असल्याने राज्यात कुठे जायचे याचा निर्णय भाजप सरकार घेऊ शकत नाही. भाजप भ्याडपणाने हल्ले करत आहे. 

याप्रकरणी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक सिंह म्हणाले की, लोहिया चौकात जेव्हा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची गाडी अडवली तेव्हा त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, थोडे पुढे चालत गेल्यानंतर प्रियांका एका गाडीवर बसल्या. पुढे मुन्शी पुलिया भागात पोलिसांनी अडविल्यानंतर त्या पुन्हा चालू लागल्या. त्यामुळे पोलिस आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तो गोंधळ सुरू असताना प्रियांका दारापुरी यांच्या घरी पोहचल्याची माहिती मिळाली. त्यांनी सुमारे तीन किलोमीटर पायी प्रवास केला. 

दारापुरी यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर प्रियांकांनी माध्यमाशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी गाडीमधून शांततेने प्रवास करत होते. मग यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कशी काय बिघडणार होती? माझ्यासोबत तीनपेक्षा जास्त लोक नव्हते. आणि मी याची कल्पना कोणालाही दिली नव्हती. मला अडविल्यानंतरही मी चालत गेले. तर मला थांबवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? जर मला अटक करायची असेल तर करा.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com