लखनऊ : देशव्यापी लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे संकटात अडकलेल्या मजुरांनी पायपीट करत घरचा रस्ता धरला आहे. या मजुरांसाठी काँग्रेसने बस सेवा देण्याचा प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारसमोर ठेवला होता. या प्रस्तावावरुन भाजप-काँग्रेस यांच्यात पत्रव्यवहाराच्या माध्यमातून उत्तर-प्रत्युत्तर अशा पद्धतीने राजकारण सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रियांका गांधी यांच्या कार्यालयाचा प्रस्ताव स्वीकारत बस सेवेच्या रुपात मदत घेण्याचे यूपी सरकारने मान्य केल्यानंतर काँग्रेसने बस अन्य राज्यातून येणार असल्याचे कारण सांगत ही सेवा पुरवण्यासाठी अवधी वाढवून मागितल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर योगी सरकारकडून काँग्रेस लखनऊमध्ये बस सेवा देण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात आता आणखी भर पडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बस सेवेच्या मुद्यावरुन तापत असलेल्या राजकारणात आता काँग्रेसच्या महिला आमदारानेही उडी घेतली आहे. विशेष म्हणजे गांधी कुटुंबियांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या अदिती सिंह यांनी बसच्या मुद्यावरुन काँग्रेसला घरचा आहेर दिलाय. अदिती सिंह यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य केले आहे. जर बसेस उपलब्ध आहेत तर राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये सेवा पुरवण्याबाबत विचार का केला नाही? असा सवाल त्यांनी काँग्रेसलाच विचारला आहे.
कोरोनाजन्य परिस्थितीत राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी आपल्या पक्षाला दिलाय.
बसच्या मुद्यावरुन काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप यापूर्वी भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र आता काँग्रेसच्याच आमदारांने आपल्या पक्षावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. रायबरेलीच्या सदर मददार संघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती सिंह यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. आपतकालीन संकटात अशा प्रकारच्या राजकारणाची गरज काय? एक हजार बसची जी यादी पाठवण्यात आली त्यात निम्म्याहून अधिक बसेस या काहीच कामाच्या नाहीत. 297 भंगार बसेस, 98 ऑटो रिक्शा आणि अम्ब्युलन्ससारखी वाबने, कोणत्याही कागदपत्राशिवाय असलेली 68 वाहने हा सर्व प्रकार भंयकर संतापजनक वाटतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
अदिती सिंह यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला आहे. जेव्हा कोटामध्ये उत्तर प्रदेशमधील हजारो विद्यार्थी अडकले होते त्यावेळी या बसेस कुठे होत्या? असा संतप्त सवाल त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यावेळी घरापर्यंत सोडा पण काँग्रेस सरकारने त्यांना सीमारेषेपर्यंतही सोडण्याची तसदी घेतली नाही, असे अदिती सिंह यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.