कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये 30 वर्षांपासून दहशत निर्माण करणाऱ्या विकास दुबेचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केला. त्याच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात अनेक चर्चा रंगल्या. तो राजकारणाचा बळी ठरला, असा सूर देखील उमटतोय. पोलिसांच्या कारवाईचा तपासानंतर याचा उलगडा होईलही. पण विकास दुबे विरोधात तक्रार नोंदवणाऱ्या राहुल तिवारीच काय झाल? याची चर्चा आता जोर धरत आहे. राहुल तिवारीने चौबे पोलिस ठाण्यात विकास दुबेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विकास दुबेच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी विकास दुबेच्या टोळक्याने पोलिसांवर केलेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 8 जण हुतात्मा झाले होते.
कोणत्या कारणासाठी राहुलने नोंदवली होती तक्रार
जादेपुर गावचा रहिवासी असलेल्या राहुल तिवारीचा सासूरवाडीतील जमीन वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरु होती. याप्रकरणात 27 जूनला विकास दुबेच्या लोकांनी त्याला मारहाण केली होती. या प्रकारानंतर राहुलने चौबेपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याची तक्रार नोंदवण्यावरुन पोलिस हल्ल्यात शहीद झालेले सीओ देवेंद्र मिश्रा आणि विकास दुबे प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या चौबेपुर स्टेशन इनचार्ज विनय तिवारी यांच्यात वाद झाला होता. विनय तिवारी राहुलची तक्रार दाखल करुन घेत नव्हता. 2 जुलैला सीओच्या आदेशानुसार अखेर तक्रार दाखल करण्यात आली होती.
राहुलने दाखल केलेल्या तक्रारीनंतरच पोलिस विकास दुबेच्या घरी गेले होते. बिकरू गावात पोलिसांसोबत घडलेल्या प्रकारानंतर राहुल तिवारी पत्नी आणि मुलांसह गाव सोडून गेला आहे. त्याचा फोनही बंद आहे. पोलिस त्याचाही शोध घेत आहेत. त्याची साक्ष नसल्यामुळे प्रकरणाचा तपास पुढे सरकणार नाही. विकासचा खात्मा झाल्यानंतर तो पुन्हा गावात परत येईल, असे पोलिसांना वाटत होते. पण अद्याप राहुल परतलेला नाही. चौबेपुर पोलिस निरीक्षक कृष्ण मोहन राय यांनी तो अद्याप गायब असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.